उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे भर प्रचार सभेत चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. ओमराजे निंबाळकर प्रचार करत असताना एका युवकाने त्यांच्याशी येऊन हात मिळवला आणि नंतर दुसऱ्या हाताने त्यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र निंबाळकर यांनी आपल्या हाताने हा हल्ला अडवला. यामध्ये त्यांच्या हाताला जखम झाली असून हल्ला करणारा तरूण फरार झाला आहे. दरम्यान जखमी निंबाळकर यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वतः ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “माझ्या हाताला थोडी दुखापत झालेली आहे. मात्र मी सुखरुप आहे. माझ्या वडिलांप्रमाणेच माझ्यावर कुणीतरी हल्ला केला असावा, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. गेले अनेक दिवस माझा पाठलाग होत असल्याचा मला संशय आहे.”
ओमराजे यांच्या मालकीच्या तेरणा साखर कारखान्याने अनेक शेतकऱ्यांची बिले थकवली आहेत. त्या रागातूनच हा हल्ला झाला असावा का? अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निंबाळकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मी सर्व थकीत बिले दिली असून एकाही शेतकऱ्याची थकबाकी उरली नसल्याचे ते म्हणाले.