घरमहाराष्ट्रराज्यपालांच्या मदतीसाठी केंद्रातून अधिकारी येणार!

राज्यपालांच्या मदतीसाठी केंद्रातून अधिकारी येणार!

Subscribe

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याचे कार्यकारी प्रमुख बनलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मदतीसाठी केंद्रातील दोन ज्येष्ठ सनदी अधिकारी लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. तूर्तास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील समजले जाणारे सनदी अधिकारी सचिन कुर्वे यांची राज्यपालांकडे नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात लोकनियुक्त सरकार स्थापन होण्यात अडचणी येत असल्याने १२ नोव्हेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कारभाराची सर्व सूत्रे राज्यपालांकडे गेली आहेत. घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपतींच्या वतीने राज्यपाल हे कारभार पाहतात. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी केंद्रातील दोन अधिकारी लवकरच मुंबईत येतील, अशी माहिती सूत्रांनी गुरूवारी दिली.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने राज्य सरकारच्या कारभारावर केंद्र सरकारचे नियंत्रण असणार आहे. राज्यपालांच्या मदतीसाठी नियुक्त करायच्या सहा अधिकाऱ्यांच्या नावांची यादी केंद्रीय गृह मंत्रालयाने तयार केली आहे. यातील दोन अधिकारी निवडून त्यांना महाराष्ट्रात पाठवले जाईल. हे अधिकारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मर्जीतील असतील आणि महाराष्ट्र केडरचे नसतील, असे सांगण्यात येते. महाराष्ट्रात पाठवायच्या अधिकाऱ्यांची येत्या दोन दिवसांत निवड अपेक्षित आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार हे अधिकारी थेट मंत्रालयात बसून राज्य सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवतील. तसेच निर्णय घेण्यासाठी राज्यपालांना मदत करतील. राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०१४ या कालावधीत राष्ट्रपती राजवट होती. त्यावेळी दिल्लीतून ज्येष्ठ सनदी अधिकारी अनिल बैजल यांना पाठविण्यात आले होते.

- Advertisement -

भूषण गगराणी यांची उद्योग विभागात नियुक्ती

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील ओळखले जाणारे भूषण गगराणी यांची उद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गगराणी हे याआधी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. परंतु, राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने गगराणी यांना मुख्यमंत्री कार्यालय सोडावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -