भारतीय जनता पक्षात येण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची रांग लागली होती. त्यातील महत्त्वाच्या लोकांना आम्ही घेतल्यानंतर उर्वरित नेतेही आमच्या पाठीमागे लागले होते. परंतू, त्यांना आम्ही नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत बोटावर मोजण्याएवढी लोकं तरी राहू शकली. अर्थात, जे पहिलवान राष्ट्रवादीत आहेत, त्यांच्यातही आपापसांत लढती होत असतात. त्यामुळे शरद पवारांची अवस्था सध्या शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर आधे उधर बाकी मेरे पिछे… असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. १७) नाशिकमधील सभेत लगावला.
गोदाघाटावरील गौरी पटांगणात आयोजित सभेत ते पुढे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात रोजगार वाढीला चालना मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. फूड पार्क हा त्याचाच एक भाग असून उद्योजकांना स्वस्त दरात विज मिळाल्यास उद्योग वाढीस चालना मिळेल. तसेच शेतमालालाही चांगला भाव मिळेल. विधानसभेच्या निवडणुका नेहमीपेक्षा वेगळ्या आहेत. यापूर्वी निवडणुकीची उत्कंठा असायची. कोणाचे सरकार येणार, कोणाच्या किती जागा लागणार याविषयी उत्सूकता असायची. पण आता शेंबड्या पोराला जरी विचारले तरी ते सांगेल की, राज्यात महायुतीचेच सरकार येणार. आरज महायुतीच्या पाठीशी प्रत्येकजण उभा आहे. निवडणूक काळात राहुल गांधी प्रचार करताना दिसत नव्हते तेव्हा वाटले की ते हरियाणात प्रचारात गेले असतील. त्यानंतर कळले की ते बँकॉकला फिरायला गेले. त्यांना माहिती आहे की, महाराष्ट्रात कितीही डोके फोडले तरी आता २१ जागाही येणार नाही. मोठ्या परिश्रमाने राहुल यांना महाराष्ट्रात आणले. आपल्या पहिल्याच सभेत आपले काम केले. गेल्या ७० वर्षांपासून भ्रष्टाचार वाढल्याचे त्यांनी भाषणात सांगून टाकले. यातील ६० वर्ष तर काँग्रेसचीच सत्ता होती. त्यामुळे आमचे डायलॉग राहुलच बोलताय हे बघून काँग्रेसचे उमेदवारही संभ्रमीत होत आहेत. नाशिकमध्ये राहुल यांची एखादी सभा झालीच तर तिन्ही उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मते मिळतील असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस?
- डिफेन्स इनोव्हेशन इंडस्ट्री
- इंडस्ट्रियल टाऊनशिप
- आयटी हब
- स्टार्ट अप उद्योग सुरु करणार
- सगळेच शस्त्र आणि अस्त्रांची निर्मिती भारतात होणार असल्याने एचएएलला मोठे काम मिळणार
- इम्पॅक्ट असेसमेंटनंतर गावठाणात क्लस्टर योजना लागू होणार
- सिडकोची घरे फ्री होल्ड होणार
- ३५० ग्रीन बसेस धावणार
- मेट्रो आणि सिटीबससाठी सिंगल कार्ड योजना लागू करणार
- गोदावरीत एक थेंबही गटारीचे पाणी जाऊ देणार नाही अशी योजना राबवणार
आघाडीवर मुख्यमंत्र्यांची टीका
- आम्ही ज्यांना घेतले नाहीत तेच आता राष्ट्रवादीत उरले
- पवारांचे पहिलवान एकमेकांशीच लढले आणि सोडून गेले
- आघाडीच्या जाहिरनाम्यान प्रत्येकाला ताजमहाल देऊ, चंद्रावर फ्लॅट देऊ इतकेच टाकणे तेवढे राहिले
- पाच वर्षात आघाडीच्या दुप्पट काम केले नसेल तर मी मतेही मागणार नाही
- देशात मुलभूत सुविधांशी संबंधित ५१ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात सुरू
- स्वा. सावरकरांना भारतरत्न मिळू नये अशी मागणी करणार्या काँग्रेसींना भ्रष्टाचार रत्न पुरस्कार द्या
- सावरकरांचे आताशी समर्थन करणार्या मनमोहनसिंग यांनी अंदमानची पाटी का काढली होती?