भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस आमदार नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. नाना पटोले यांना शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा आक्रमक नेता म्हणून देखील ओळखले जाते. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून किसन कथोरे तर महाविकासआघाडीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नाना पटोले या दोघांनी अर्ज दाखल केले होते. विधानसभेच्या अध्यक्षाची जबाबदारी ही विधीमंडळाचे कामकाज योग्य पद्धतीने चालावे ही असते.
शनिवारी रात्रीपासून भाजपशी संपर्क करण्यास सुरुवात केली होती. विधासाभा अध्यक्ष हे पद विवादात येऊ नये. त्यामध्ये चुरस होऊ नये, असे चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सांगितले. तसेच सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला कालपासून विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीस आणि मी चर्चा केली. विधानसभा अध्यक्षपद हे वादातीत असावे, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे, ती कायम राहावी, यासाठी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.’ , असे देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
कोण आहेत नाना पटोले?
- भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून नाना पटोले हे निवडून आले. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून २०१४ ते २०१७ या काळात त्यांनी भाजपच्या तिकीटावर खासदारकी पद भूषवलं.
- काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी पटोले २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत भंडारा- गोंदिया मतदार संघात विजयी झाले होते. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.
- शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार यशस्वी होत नाही, असे सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोलेंनी हल्लाबोल केला होता. २०१७ मध्ये नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेस पक्षात सहभागी झाले.
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते म्हणून नाना पटोले यांची ओळख आहे. पटोले आक्रमक असले तरी ही आक्रमकता योग्य ठिकाणी वापरु, अशी प्रतिक्रिया त्यांनी उमेदवारीच्या घोषणेनंतर दिली होती.
- काही मुद्द्यांवरुन पक्षासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये भाजप आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ११ जानेवारी २०१८ रोजी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
- नागपूर मतदारसंघातून नाना पटोले यांनी २०१९ मध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला.