शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचं सरकार स्थापनेच्या अंतिम टप्प्यावर आलेलं असतानाच आता भाजपकडून नवी गुगली टाकण्यात आली आहे. ‘सर्वच बाबतीत भाजपच राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपशिवाय सत्तास्थापना होणं अशक्य आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विजयी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला’, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. वसंतस्मृतीमध्ये भाजपच्या तीन दिवसीय बैठकांचा आज दुसरा दिवस आहे. या दरम्यान, पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना या बैठकीत काय झालं, याची माहिती पत्रकारांना दिली. ‘१०५ आमदार आणि १४ अपक्ष अशा ११९ आमदारांना घेतल्याशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचं नेतृत्व असलेलं सरकारच महाराष्ट्रात स्थापन होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे’, असं देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
‘आयात २६ पैकी १६ उमेदवार जिंकले’
‘भाजपला या विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त म्हणजे १ कोटी ४२ लाख तर दुसऱ्या क्रमांकाची मतं राष्ट्रवादी काँग्रेसला ९२ लाख मतं मिळाली तर शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ९० लाख आहेत. गेल्या वेळी २६० जागा लढवल्यानंतर ११२ जागा जिंकल्या, तर यावेळी १६४ जागा लढवल्यानंतर १०५ जागा जिंकल्या. सर्वाधिक महिला आमदार १२ भाजपच्या आहेत. अनुसूचित जातीचे सर्वाधिक ९ आमदार भाजपचे आहेत. बाहेरून आलेल्या २६ उमेदवारांपैकी १६ जण जिंकून आले आहेत. त्यामुळे एकंदरीत सगळ्याच आघाड्यांवर भाजप राज्यातला क्रमांक एकचा पक्ष आहे. १९९०नंतर कोणत्याही एका पक्षाला १०० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. भाजपनं २०१४ आणि २०१९मध्येही १००हून जास्त जागा जिंकल्या आहेत’, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा – सरकार आघाडीचेच; भाजपशी चर्चा नाही-शरद पवार
Delhi: BJP holds a protest outside All India Congress Committee (AICC) office, demanding an apology from Rahul Gandhi over his remarks on #Rafale verdict. pic.twitter.com/GkxTb264Ns
— ANI (@ANI) November 15, 2019
‘राहुल गांधी माफी मांगो’ आंदोलन
राहुल गांधींनी राफेलच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढले. पण त्यांना कोर्टात माफी मागावी लागली. त्यामुळे आता राहुल गांधींनी देशाची माफी मागायला हवी. त्यासाठी भाजपकडून नजीकच्या काळात देशभरातल्या जिल्ह्यांमध्ये ‘राहुल गांधी माफी मांगो’ हे आंदोलन करण्यात येणार आहे.