शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे महाशिवआघाडी या राज्यातील नव्या समीकरणाबाबत सध्या तिनही पक्षांमध्ये चर्चासत्र सुरु आहे. आज, बुधवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी योग्य वेळी निर्णय सर्वांना समजेल, असे उत्तर माध्यमांना दिले. तसेच काँग्रेस नेत्यांसोबतची चर्चा योग्य दिशेने सुरु असून ही चर्चा सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे.
Uddhav Thackeray after meeting with Congress leaders: Discussions have started, whatever decision will be taken we will inform soon. #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/YWkRm2ttPe
— ANI (@ANI) November 13, 2019
काय म्हणाले बाळासाहेब थोरात
काँग्रेस नेत्यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे माध्यमांसमोर आले. बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना, ही केवळ सदिच्छा भेट होती, अशी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी असून आधी राष्ट्रवादीसोबत आम्ही चर्चा करू. नंतर गरज असल्यास शिवसेनेशी चर्चा केली जाईल, असेही थोरात यावेळी म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यांमधील विरोभास यावेळी पाहायला मिळाला. तसेच उद्धव ठाकरेंना सकारात्मक वाटणारी ही भेट थोरातांच्या लेखी केवळ औपचारीक आणि सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट झाले.
भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थतात दाखवल्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली. २४ तासांची मुदत शिवसेना पाळू शकली नाही. त्यानंतर राष्ट्रवादीला मुदत देण्यात आली. मात्र राष्ट्रवादीची मुदत पूर्ण होण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणारे पत्र पाठवले. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंदर्भात निर्णय घेतला आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.