कोथरूडमध्ये राज ठाकरेंची सभा होणार, तेव्हाच ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीवरून जोरदार टीका करणार हे अपेक्षित होतं. त्यानुसारच त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘बाहेरचा उमेदवार इथे लादण्यामागे एकच कारण आहे. ते म्हणजे तुम्हा मतदारांना गृहित धरणं. आम्ही कुणालाही उमेदवारी दिली, तरी मतदार त्यांना निवडून देतील असं मानून चालणं. मला एक कळत नाही. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असून सुद्धा ते कोल्हापूरमधून का निवडणून लढवत नाहीत? तिथून निवडणूक लढवायला तुम्हाला भिती का वाटते? सत्ता डोक्यात जाते, तेव्हा हे असं घडतं’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील हातालाही लागणार नाहीत
‘काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रात जातीचं राजकारण घडत नव्हतं. अमुक एका जातीचं प्राबल्य म्हणून तिथे त्याच जातीचा उमेदवार दिला जातोय. मतदारसंघातून सर्वात मोठा निकष असायला हवा तो म्हणजे उमेदवार मतदारांचं काम करणार आहे की नाही. कोथरूडमध्ये तर सोपं गणित आहे. इथला आमदार इथला असायला हवा, की बाहेरचा हाच निर्णय कोथरूडकरांना करायचा आहे. निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील हातालाही लागणार नाहीत. हे घडतं, कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
मनमोहन सिंग म्हणाले, ‘मंदीचा तुम्हाला अंदाजही आलेला नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. आणि त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्वत: सांगितलं की गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात ५ लाख उद्योग बंद झाले आहेत’, असं राज ठाकरेंनी नमूद केलं. ‘माझं मोदींशी वैयक्तिक शत्रुत्व नाही. पण जेव्हा देशाला भोगावे लागणारे निर्णय घेतले गेले, तेव्हा बोललंच पाहिजे. मोदींनी नोटाबंदी जाहीर करताना म्हटलं होतं मला फक्त ५० दिवस द्या. नोटबंदी २०१७मध्ये झाली. आता २ वर्ष झाली’, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
‘अनेक घुसखोर पुण्या-मुंबईत घुसलेले आहेत. पोलिसांना देखील माहिती असतं. पण ते करतील काय? पोलिसांना आपण हसण्यावारी नेतो. पण ते हाताची घडी घालून उद्या बसले, तर आपलं काय होईल कुणास ठाऊक. त्या पोलिसांना देखील मोकळीक नाही. जर ठरवलं, तर नक्की बदल होऊ शकतो. पण इच्छा कुणाची आहे?’ असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.