मुंबईतल्या सभांना मोठी गर्दी झाल्यानंतर आता राज ठाकरेंची पुण्यात सभा झाली. पुण्याकल्या कसबा पेठेतले मनसे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी पुण्याच्या कोथरूडमधील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना ‘चंपा’ असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. ‘आमचा अजय शिंदे चंपाची चंपी करेल’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. ‘कोल्हापूर-सांगलीमध्ये पूर आला आणि सरकारमधला एक मंत्री पुण्यापर्यंत वाहत आला’, असा टोमणा राज ठाकरेंनी यावेळी लगावला. ‘सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती असताना देखील आमचे मंत्री प्रचारात व्यस्त होते’, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
‘फक्त जाहीरनाम्यांमध्ये सांगतात, शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात स्मारक बांधू. काँग्रेसच्या काळात ही घोषणा झाली होती. ते गेले. त्यांच्यानंतर हे आले. यांनीही यांच्या जाहीरनाम्यात टाकलं. नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस असं सगळ्यांनी समुद्रात जाऊन फुलं टाकली. परत त्यांना तिथं नेलं, तर कुठं फुलं टाकली ती जागाही दाखवता येणार नाही’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. ‘इथे फक्त घोषणा होत राहिल्या. तिथे गुजरातमध्ये ३ हजार कोटी खर्चून पुतळा उभा देखील राहिला. पण इथे अजून शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहतोय. पुतळे सोडा, छत्रपतींचे किल्ले पहिल्यासारखे उत्तम पद्धतीने उभे करा’, असं देखील राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, ‘मी असतो, तर भाजपची जागावाटपात असं वागायची हिंमत झाली नसती!’
‘अमोल यादव या मराठी मुलानं पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या विमानाचं तंत्रज्ञान विकसित केलं. त्याला मुख्यमंत्र्यांनी पनवेलजवळ जमीन आणि आर्थिक मदतीचं आश्वसन दिलं. पण त्याला काहीही दिलं नाही. तो मराठी मुलगा अमेरिकेत गेला, तिथे त्याला जागाही दिली आणि प्रकल्पासाठी पैसे देखील दिले’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
‘पुण्यासारख्या शहरामध्ये एक जागा देखील भाजपनं शिवसेनेला दिली नाही. निवडणुकांआधी शिवसेनेनं स्वबळाची भाषा केली होती. पण त्यानंतर पुन्हा युती केली आणि फक्त १२४ जागा घेतल्या. जर बाळासाहेब ठाकरे आज असते, तर भाजपची असं करायची हिंमत झाली नसती. माझ्यासोबत देखील भाजपची असं करायची इच्छा झाली नसती. हे सगळं शिवसेनेच्या लाचारीमुळे होतंय’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.