शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या निवडणुकांवेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी युतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचे सांगितले आहे. दोन्ही पक्षांनी आज आपापल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर हे दावे केले आहेत. युती होणार यावर दोन्ही नेत्यांनी ठामपणे वक्तव्ये केली असली तरी युतीच्या जागावाटपाबाबत दोन्ही पक्षात अंतर्गत धुसफूस असल्याचे उभय नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांवरुन जाणवते.
दादर येथील शिवसेनाभवनमध्ये आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षात कुठलीही खळखळ नसल्याचे सांगितले. दोन दिवसांत सर्व काही समजेल. तसेच मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची यादी जाहीर करावी, हे उपहासात्मक नसून आम्ही यावेळी वेगळी पद्धत अवलंबली असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. सेनेचे सचिव अनिल देसाई यांनी युती होणारच यावर ठाम असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता “अनिल देसाई काय बोलले हे मी ऐकले नाही, त्यांच्याशी मी चर्चा करतो”, असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले.
दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १४४ जागा मिळाल्या नाही, तर युती होणार नाही, असे एका वृत्तवाहिनीवर सांगितले होते. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी घुमजाव करत अर्ध्या-अर्ध्या जागांचा फॉर्म्युला माध्यमांनीच पसरवला असल्याचे सांगितले. आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला लोकसभेवेळीच ठरला असून लवकरच तो जाहीर करु, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Shiv Sena Chief Uddhav Thackeray on seat sharing for Maharashtra assembly polls: We have held systematic talks with BJP leaders. I hope that in a day or two we will come to a decision pic.twitter.com/VvNmeFKTkx
— ANI (@ANI) September 20, 2019
विधानसभा निवडणूक ही सणासुदीच्या काळात आलेली आहे. सध्या पितृ पक्ष सुरु असल्यामुळे युतीचे काही ठरत नाही, असे सांगितले जात होते. मात्र यावर आता चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पितृ पंधरवड्यापर्यंत युतीच्या घोषणेसाठी वाट पाहणे, हे सध्याच्या फास्ट लाईफमुळे शक्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले.