शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. भाजप आणि शिवसेना यांच्यातील २५ ते ३० वर्षांची युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने शिवसेनेने सरकार स्थापन केले. नव्याने स्थापन झालेल्या या सरकारचा आज ऐतिहासिक क्षण होता. विशेष म्हणजे शिवसेनेच्या इतिसाहात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहला जाणार आहे. त्यामुळे मोठ्या जल्लोषात हा सोहळा संपन्न झाला.
#WATCH Uddhav Thackeray takes oath as Chief Minister of Maharashtra. #Mumbai pic.twitter.com/pKaAjqYvWM
— ANI (@ANI) November 28, 2019
शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातील दिग्गजांची हजेरी
शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आपल्या मुलासह शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यासोबतच राष्ट्र्वादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते हजर होते. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र पाठवून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. युवासेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: दिल्लीला जावून गांधी यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. मात्र, गांधी काही कारणास्तव शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना, राषट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी तर शपथ घेतली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.