विधानसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पक्षांच्या नेत्यांकडून प्रचार सभा देखील घेतल्या जात आहेत. एकीकडे प्रचार सुरु आहे तर दुसरीकडे मात्र, या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. पनवेल येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई उद्भवत असून त्यावर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नसल्याने हा बहिष्कार घालण्यात आला आहे.
यासाठी घालण्यात आला मतदानावर बहिष्कार
गेल्या अनेक दिवसांपासून पनवेल मधील सेक्टर २० येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करुन देखील त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या पनवेलकरांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
नो वॉटर, नो वोट
पनवेल सेक्टर २० मधील सर्व रहिवाशी एकवटले असून त्यांनी ‘नो वॉटर, नो वोट’, अशा घोषणा देत विधानसभेच्या निवडणूकीवर बहिष्कार घातला आहे. जोपर्यंत आमचा पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तसेच यंदाच्या विधानसभेत मतदान देखील करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा – वरळीत मतदानावर बहिष्कार