नोटाबंदीला गुरुवार, ८ नोव्हेंबरला २ वर्ष पूर्ण झाली असून आता विरोधक मोदी सरकारला याच नोटाबंदीवरून घेरताना पहायला मिळत आहे. शुक्रवार, ९ नोव्हेंबरला मुंबईत सीएसएमटी येथे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी या विरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर, विशेषत: मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तडीपार अमित शहा यांना लोक आता कायमचे बाय-बाय करतील, असे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अमित शहा यांना तडीपार अध्यक्ष म्हणत या तडीपार अध्यक्षाला तर लोक राजकारणातूनच कायमचे तडीपार करतील, असे देखील त्यांनी सांगितले.
सीएसटी स्थानकासमोर नोट बंदीच्या दोन वर्षेपूर्तीसाठी काँग्रेसकडून सरकार विरोधात जोरदार निदर्शने… #Demonitization @PMOIndia @narendramodi pic.twitter.com/6qN9JVjcNS
— My Mahanagar (@mymahanagar) November 9, 2018
काय म्हणाले निरूपम
देशातील तसेच गुजरातमधील व्यापारी मोदी यांना हटवून पुन्हा काँग्रेसला आणण्याचे आता जाहीरपणे बोलत आहेत. गुजराती माणसे मोठ्या गर्वाने मोदींना आपला माणूस समजतात. पण मोदींनी आपल्या माणसांनाच धोका दिला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण खूप जास्त आहे. महाराष्ट्रात फक्त एका वर्षात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकारने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. आज परिस्थिती अशी आहे की, दिवाळी असून व्यापारांची स्थिती वाईट झाली आहे. त्यामुळे हे सरकार आता घालवण्याची वेळ आली असून, यांना आता लोकच कायमचे टाटा बाय- बाय करतील. तसेच नोटाबंदीला आता ६०० दिवस होऊन गेले यावर मोदी कधी बोलणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच मोदींना कुणी फाशीवर चढवणार नाही. पण येत्या काळात देशातील जनताच मोदींची राजकीय हत्या करतील, असे त्यांनी सांगत मोदींवर निशाणा साधला.