हिंदू धर्मात, कोणत्याही गोष्टीची सुरवात शुभ काम करुन किंवा शुभ गोष्टी पाहून केली जाते. त्यामुळे भारतातील पौराणिक ग्रंथानुसार सकाळी झोपेतून उठल्या-उठल्या सर्वातआधी आपल्या हातांकडे पाहून त्याचे दर्शन घेणं शुभ मानलं जातं. शास्त्रात झोपेतून उठल्याबरोबर सर्व प्रथम हातांचे तळवे (करतळ) दर्शनाचा नियम सांगितला आहे. यामुळे व्यक्तीची स्थिती सुधारते आणि सौभाग्य वाढते.
हाताच्या तळव्यांकडे पाहून हा श्लोक म्हणावा. ज्यामुळे मनुष्याला जीवनात धन, ज्ञान आणि देवाची कृपा मिळते.
कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती।
करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम्।।
या वरील श्लोकचा अर्थ असा आहे की, माझ्या हाताच्या समोर देवी लक्ष्मीचा वास आहे. विद्यादात्री सरस्वती मध्यभागी तर भगवान विष्णू मूळ भागात वास करतात. म्हणूनच मी सकाळी त्यांचे दर्शन करतो. या श्लोकात धनाची देवी लक्ष्मी, विद्येची देवी सरस्वती आणि सृष्टीचे पालनपोषण करणारे भगवान विष्णू यांची स्तुती करण्यात आली आहे, ज्यामुळे मनुष्याला जीवनात धन, ज्ञान आणि देवाची कृपा मिळते.
हातांच्या तळव्याचे दर्शन घेण्याचा मूळ अर्थ असा आहे की, यामुळे आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो. जीवनात धन, सुख आणि ज्ञान प्राप्त व्हावे, आपल्या हातांनी कोणतेही वाईट काम होऊ नये आणि नेहमी इतरांच्या मदतीसाठी हात पुढे असावा. अशी प्रार्थना आपण देवाकडे करतो.