हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
31 ऑगस्टपासून सुरू होत असलेला गणेशोत्सव पुढील दहा दिवस साजरा केला जाईल. या काळात बाप्पाची मनोभावे सेवा आणि पूजा केल्यास पुढील वर्षभर आपल्या कोणत्याही संकटांचा सामना करावा लागू शकत नाही.
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची स्थापना कशी कराल?
शास्त्रामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.
- त्यासाठी सर्वप्रथम एक पाट किंवा चौरंग साफ करून घ्या, त्यानंतर त्यावर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करा.
- त्यानंतर त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्या आणि त्यावर अक्षता ठेवा.
- आता या पाटावर किंवा चौरंगावर गणेश मूर्तीची स्थापना करा.
- परंतु मूर्ती स्थापन करताना मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी-सिद्धी च्या रूपात एक-एक सुपारी ठेवा.
- आता गणपतीच्या उजव्या बाजूस पाण्याचा एक कलश भरून ठेवा.
- आता हातामध्ये अक्षता आणि फुल घेऊन बाप्पाने मनात ध्यान करा. त्यानंतर ॐ गं गणपतये नम: या मंत्राचा जप करा.
गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त
- गणेश चतुर्थी तिथी प्रारंभ : 30 ऑगस्ट, मंगळवार, दुपारी 3 वाजून 34 मिनिटांपासून ते
- गणेश चतुर्थी तिथी समाप्ती : 31 ऑगस्ट, बुधवार, दुपारी 3 वाजून 23 मिनिटांपर्यंत
- गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त : 31 ऑगस्ट, बुधवार, सकाळी 11 वाजून 5 मिनिटांपासून ते 1 सप्टेंबर रात्री 1 वाजून ३८ मिनिटांपर्यंत असेल.