हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. यंदा रामनवमी 30 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. रामनवमीनिमित्त प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातील अनेक रहस्य, कथा आवर्जुन सांगितल्या जातात. प्रभू रामांच्या जन्माप्रमाणेच त्यांच्या मृत्यूची देखील कथा आहे. श्री राम साक्षात विष्णू अवतार होते. मग तरीही त्यांचा मृत्यू कसा झाला असेल? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. आज आम्ही तुम्हाला श्री रामांच्या मृत्यूची कथा सांगणार आहोत.
रामायण आणि काही पुराणांनुसार, इसवी सन पूर्व 5114 मध्ये श्री प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता. प्रभू श्री रामचंद्र हे भगवान श्रीविष्णूंचा सातवा अवतार मानला जातो. त्रेता युगामध्ये अयोध्येचा राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्यापोटी श्रीरामांचा जन्म झाला.
प्रभू रामचंद्रांचा मृत्यू कसा झाला?
पहिली कथा
हिंदू पुराणांनुसार, प्रभू रामचंद्रांचा मृत्यूबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार, देवी सीतेने आपली मुलं लव आणि कुश यांना श्रीरामांच्या स्वाधीन केले आणि त्या धरती मातेसोबत जमीनीत सामावल्या आणि आपले अवतारकार्य संपवले. सीतेच्या जाण्याने भगवान श्रीराम इतके दुःखी झाले की त्यांनी यमराजाची संमती घेऊन शरयू नदीत जलसमाधी घेत आपले अवतारकार्य संपवले.
दुसरी कथा
हिंदू पुराणांनुसार, एकेदिवशी भगवान हनुमान अयोध्येत नसताना यमदेवांनी एका ऋषीचा वेश घेऊन अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी एकांतात बोलण्यासाठी श्रीराम आणि यमदेव एका खोलीत गेले. त्यांच्यातील संभाषण कोणीही ऐकू नये म्हणून भगवान श्री राम बंधू लक्ष्मण यांना दारात उभे राहण्यासाठी सांगतात. मात्र, त्यानंतर काही वेळाने दुर्वासा ऋषी तेथे आले आणि श्रीरामांना भेटण्याची विनंती करू लागले. लक्ष्मणाने नकार दिल्यानंतर ऋषी राजी झाले आणि रागाने बोलू लागले. दुर्वासांचा राग टाळण्यासाठी लक्ष्मण त्या खोलीत गेले जेथे श्रीराम आणि यमदेव बोलत होते.
भाऊ लक्ष्मणाने आदेशाचे उल्लंघन केलेले पाहून श्रीराम लक्ष्मणावर संतापले आणि त्यांना देशातून हाकलून देण्याचे आदेश दिला. लक्ष्मणासाठी हे मृत्यूसारखेच होते, म्हणून त्यांनी शरयू नदीत विलीन होऊन आपले अवतारकार्य संपवत शेषनागाचे रूप धारण केले. भावाच्या जलसमाधीमुळे दुखावलेल्या श्रीरामांनीही जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी देखील शरयू नदीत जलसमाधी घेऊन आपले अवतारकार्य संपवले भगवान विष्णूचा अवतार घेतला. अशाप्रकारे श्रीराम मानवी देह सोडून पुन्हा वैकुंठ धामला गेले.
हेही वाचा :