Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीReligiousSaint Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Saint Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तंव तिये इष्टीचिया बुडीं । पशुहिंसा रोकडी ।
मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ? ॥
तर प्राण्यांच्या बचावाकरता करावयाच्या यज्ञामधे आरंभीच जनावरांचे प्रत्यक्षपणेच प्राण घेतले जातात, अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार ?
पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा ? ।
परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥
नुसती हिंसा पेरली असता तेथे अहिंसा उगवेल काय ? (तर नाही). परंतु याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे.
आणि आयुर्वेदु आघवा । तो याच मोहोरा पांडवा ।
जे जीवाकारणें करावा । जीवघातु ॥
आणि सर्व आयुर्वेदही (वैद्यकशास्त्रही) अर्जुना याच धोरणचा आहे. कारण की एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसर्‍या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो.
नाना रोगें आहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं ।
ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥
नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दु:खाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा (दु:ख) निवारण करण्याकरता औषधांची योजना केली.
तंव ते चिकित्से पहिलें । एकाचे कंद खणविले ।
एका उपडविलें । समूळीं सपत्रीं ॥
तो औषधयोजनेत पहिल्याप्रथम कित्येक झाडांचे कंद खाणवले व कित्येकांना मुळांसकट व पानांसकट उपटविले.
एकें आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली ।
एकें गर्भिणी उकडविली । पुटामाजीं ॥
काही झाडे मध्येच मोडली (म्हणजे त्याच्या मधल्या भागाचा औषधात उपयोग केला.) काही झाडांची साल काढवली व काही फळ देण्याच्या बेतात असलेल्या वनस्पती, त्यावर क्षाराचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडविल्या.
अजातशत्रु तरुवरां । सर्वांगीं देवविल्या शिरा ।
ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा । कोरडे केले ॥
(ज्यांनी) कोणाचे केव्हाच वाकडे केले नाही, म्हणून ज्यांना शत्रु उत्पन्न झाला नाही अशा बिचार्‍या झाडांना (त्याचा चीक काढण्याकरता) त्यांच्या सर्वांगावर भेगा पाडून, याप्रमाणे अर्जुना, त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले.

Manini