मराठी दिनर्दशिकेनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे. यावर्षी हा सण 3 जून रोजी साजरा केला जाईल. या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. पण या वट सावित्री व्रतात वडाची पूजा नक्की का केली जाते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते?
पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं, वडाच्या झाडाची पूजा केल्याने दीर्घायुष्य लाभते आणि कलह, रागापासून मुक्ती मिळते. याच्या पूजेने घरात सुख-समृद्धी येते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. वडाच्या झाडात ब्रह्म, विष्णू, महेश हे त्रिदेव वास करतात. वडाच्या मुळाशी ब्रह्मदेव, खोडात भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये महादेव वासांचा वास आहे. याशिवाय झाडाच्या फांद्या, ज्या खाली लटकतात, त्यांना देवी सावित्री म्हणतात. त्यामुळे वडाची पूजा केल्याने त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि देवी सावित्रीची कृपा देखील आपल्यावर कायम राहते.
देवी सावित्रीने वाचवले होते पतीचे प्राण
पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला देवी सावित्रीच्या पतीचे वटवृक्षाखाली पुनरुत्थान झाले. सावित्री देवीची पतीप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम पाहून यमराजांनी सावित्रीच्या मृत पतीला जीवनदान दिले. तेव्हापासून जी सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करेल, तिला सावित्री देवीसारखे अखंड सौभाग्य प्राप्त होईल. तेव्हापासून सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करु लागल्या.