परतणार्या पावसाने राज्यात मृत्यूचे तांडव घातले असून आतापर्यंत पावसामुळे 28 जणांना जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे. अतिवृष्टीमुळे राज्याच्या पुणे विभागात 28 जणांचा, मध्य महाराष्ट्रात १६ जणांचा तर कोकणात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
अतिवृष्टीमध्ये पुणे विभागात एकूण 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक १४ मृत्यू सोलापूर जिल्ह्यात झाले आहेत. सोलापूरला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी काठावर बांधकाम सुरू असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. माढा येथील ओढ्यातून चारचाकी वाहून गेल्याची घटना घडली.
सांगली जिल्ह्यात देखील 9 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सांगलीच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन 36 फुटापर्यंत पोहोचली होती. सांगलीत पावसाने कहर केल्याने 90 मार्ग बंद करावे लागले होते.
पुणे जिल्ह्यात पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला तर सातार्यात एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे 513 जनावरांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. विदर्भात देखील अनेक ठिकाणी वीज पडल्याने जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले आहे. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना शासनाने आणि पीक विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसंगी कर्ज काढून शेतकर्यांना मदत करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूर, वाशिम-हिंगोलीपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. खरिप हंगामातील पिके काढण्याची कामं सुरू असताना पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्यांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.