मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यातील चिचली पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात शुक्रवारी एका विवाहित अनुसूचित जातीच्या महिलेने आत्महत्या केली. आत्महत्या करण्याच्या ४ दिवसांपूर्वी ३२ वर्षीय या महिलेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पण गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही, असा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.
शुक्रवारी पोलिसांनी याप्रकरणातील एका आरोपीला अटक केली तर दोन आरोपींना पीडितेला आत्महत्यास प्रवृत्त केल्याबद्दल अटक केली आहे. याबाबत माहिती देताना गाडरवाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी एसआर यादव म्हणाले की, ‘या प्रकरणात लापरवाही केल्याच्या आरोपाखाली गोटटोरिया पोलीस चौकीच्या सहाय्यक उपनिरीक्षक मिश्रीलाल कोडपे निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणातील तीन आरोपी अरविंद चौधरी, परशु चौधरी आणि अनिय राय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.’
यादव पुढे म्हणाले की, ‘सोमवारी पीडित महिला दोन भाच्यांसोबत शेतात गेली होती. तिथे आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या दोन भाचे म्हणाले की, ‘आरोपींनी तिला पडकले आणि छेडले.’ परंतु त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याबाबत सांगितले नाही. घटनेच्या दिवशी महिला आणि तिचा पती पोलिसांत तोंडी तक्रार दिली होती. परंतु तक्रार ती स्पष्ट नव्हती. दरम्यान शुक्रवारी गावात पाणी आणण्यासाठी पीडित गेली होती तेव्हा एका महिलेने तिला टोमणा मारला होता. त्यानंतर पीडितेने घरी जाऊन गळफास लावून आत्महत्या केली.’
पीडितेच्या पतीन आरोप केला आहे की, ‘गेल्या तीन दिवसांपासून ते गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न करीत होते मात्र काही उपयोग झाला नाही.’ यादव म्हणाले की, ‘या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी अरविंदचे वडील मोतीलाल आणि एक इतर महिला लीलाबाई यांना आम्ही पीडितेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपावर भादंवि कलम ३०६ अंतर्गत ताब्यात घेतले आहे, कारण त्यांनी पीडितेचा अपमान केला. सध्या पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.’
हेही वाचा – भाजप-काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची अभद्र युती; अल्वपयीन मुलींचे सेक्स रॅकेट चालवले