देशातील भांडवलदारांना फायदा होणारे तीन कृषी कायदे आणून मोदी सरकारने देशातील शेती व्यवस्थाच संपवायला आणली. याविरुद्ध शेतकर्यांनी उग्र आंदोलन सुरू केले. गेले ११ महिने आंदोलन करणार्या शेतकर्यांपुढे मोदी सरकारला झुकावे लागले असून, अखेर शेतकरी वर्गावर अन्याय करणारे काळे कायदे रद्द करावे लागले. ही देशातील शेतकर्यांनी केलेली क्रांती असल्यामुळे मोदी सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले आहे. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशातील शेतकरी जगला तर देश जगेल हे सूत्र असताना मोदी सरकारने भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेऊन देशातील फायद्यात असणारे अनेक उद्योग धंदे खासगीकरणाच्या नावाने भांडवलदारांच्या घशात घातल्याचा आरोप घरत यांनी केला. आंदोलन चिरडून टाकण्यासाठी मोदी सरकारने शेतकर्यांचे रक्त सांडले असे सांगताना लढ्यात मरण आलेल्या शेतकर्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, महिला तालुकाध्यक्षा रेखा घरत, विधानसभा मतदारसंघ महिला अध्यक्षा संध्या ठाकूर, मच्छीमार नेते मार्तंड नाखवा, अकलाख शिलोत्री, कमलाकर घरत, सदानंद पाटील उपस्थित होते.