भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये न येण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच सोमय्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यावरुन सोमय्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्यांच्या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी म्हटलं आहे की, मला त्याच्याबद्दल आता काही माहिती नाही. मी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होतो तिकडून आता पुण्याच्या एका कार्यक्रमाला आलो आहे. इथून मुंबईला जाणार आहे. मुंबईत गेल्यानंतर या प्रकरणाची संपुर्ण माहिती घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढत असल्यामुळे राज्य सरकार घाबरलं असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे की, मला आता काहीही माहिती नाही. आम्ही विकास कामाला महत्त्व देतो. लोकांच्या प्रश्नाला, अडचणींना महत्त्व देतो. मला असं वाटत की लोकांचे लक्ष वेगळ्या कारणाने दुसरीकडे वळवण्यापेक्षा नागरिकांचे प्रश्न काय आहेत? कोरोनासंदर्भात काय पुढची काळजी घेतली पाहिजे? इतर अडचणी सोडवण्यासाठी काय केले पाहिजे? परंतु सध्या सोमय्यांच्या प्रकरणात माझ्याकडे माहिती नाही. यामुळे त्याबाबत माहिती घेतल्यानंतर प्रतिक्रिया देईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकार्यांचा न येण्याचा आदेश
कोल्हापूर कलेक्टरचा पोलिसांना आदेश आला आहे की, किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला येऊ देऊ नका, सोमय्या यांनी म्हटलं आहे की, गृहमंत्र्यांचा आदेश असल्याची माहिती मला देण्यात आली आहे, कसेही करुन किरीट सोमय्या यांना घराबाहेर पडू देऊ नका, किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला कसेही करुन पोहचू देऊ नका, सोमय्या कोल्हापूरला गेले तर तक्रारीचे कागदपत्र सादर करुन घोटाळे बाहेर येतील. यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही राजीनामा द्यावा लागेल म्हणून ही सगळी गुंडगिरी सुरु आहे असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
हेही वाचा : मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश, सोमय्यांचा गंभीर आरोप