राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशाच आता मनसेच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेचे 50 पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली. यामध्ये तब्बल 50 पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांशी चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. मनसे शहर आणि जिल्हा कार्यकारिणीत नव्या वर्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक तातडीने घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. या बैठकीत महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर आता राज ठाकरे हे लवकरच नाशिक दौर्यावर जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यासंबंधी नाशिकचे मनसे सचिव पराग शिंत्रे यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे मनसेच्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातही मोठा अटीतटीचा सामना असणार आहे. मुंबई पालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत हा गड भाजप जिंकणार असं थेट चॅलेंज भाजपच्या बड्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे. तर शिवसेनेचा भगवा झेंडा कायम राहणार असल्याचं ठाम मत शिवसेनेकडून मांडण्यात आलं आहे. यावरून बरंच राजकारण पेटल्याचं पाहायला मिळालं.