महाराष्ट्रात संचारबंदी लागू केल्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येत राज्याला संदेश दिला. लोकांकडून सरकारला सहकार्य मिळत आहे. मात्र रोज सकाळी ट्राफिक जाम असल्याचे निरोप मिळतो तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी पोलिसांकडून अटकाव होत आहे. मात्र या परिस्थितीत आता सर्वांनीच समजुतदारपणा दाखवला पाहीजे. यापुढे जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात काही अडचण येत असेल तर १०० नंबर वर कॉल करा, पोलिसांकडून तुम्हाला मदत करता येईल. मात्र या संकटाचा कुणी संधी म्हणून वापर करु नये, असा स्पष्ट संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला.
जीवनावश्यक वस्तूंची सेवा पुरविणाऱ्या लोकांची अडवणूक करता कामा नये. मात्र जीवनावश्यक वस्तूंची ने आण करणाऱ्या कंपन्यांनीही आपल्या कंपनीचे नाव गाडीवर लावणे आणि कर्मचाऱ्यांनी आयडी कार्ड बाळगणे गरजेचे आहे. पोलिसांनी जरा समजून घ्यावे की आपण कायदा लागू केला असला तरी आपले जगणे बदलले नाही. नागरिकांनीही टेहळणी करण्यासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
संकटाची संधी म्हणून वापर करु नये
दोन दिवसांपूर्वी मुंबईत पोलिसांनी काही लाख मास्क धाड टाकून पकडले. मला त्या पोलिसांचे अभिनंदन करायचे आहे. आपल्याकडे अन्न धान्याचा साठा मुबलक आहे. मात्र या वस्तूंचा कुणीही साठा करु नये, संकट काळ आहे. मात्र संकाटाची कुणी संधी म्हणून वापर करु नये.
काही संस्था आता पुढे येऊन मदत करत आहेत. सिद्धिविनायक ट्रस्ट पुढे आले आहे. तर लालबागच्या राजाने रक्तदान शिबीर सुरु केले आहे, मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा भासू शकतो. इतर संस्थांनीही रक्तदान शिबीर घेण्यास पुढे आले पाहीजे. या संकटावर सर्व बाजुने मात करण्यासाठी हात पुढे येत आहे. सामान्य जनतेने यंत्रणेवर ताण येईल, असे कोणतेही काम करु नका. या महत्त्वाच्या टप्प्यावर सर्वांचे सहकार्य हवे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.