घरताज्या घडामोडी"ती" पूरग्रस्त गावे सौर दिव्यांनी उजळणार - ऊर्जामंत्री नितीन राऊत

“ती” पूरग्रस्त गावे सौर दिव्यांनी उजळणार – ऊर्जामंत्री नितीन राऊत

Subscribe

ऊर्जामंत्र्यांनी केली रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाडमधील तळीये गावात मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे गावाचे मोठे नुकसान झाले असून महावितरणाचे डीबी (डिस्ट्रिब्यूशन बोर्ड) पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. पूरामुळे ज्या गावामध्ये सध्या वीजपुरवठा होणे शक्य नाही, अशा गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरीकांना नितीन राऊत यांनी दिलासा दिला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना, त्यांनी पेण, महाड,नागोठणे येथील पूरग्रस्त भागांची आणि महावितरण व महापारेषण यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. महावितरणचे संचालक संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे यावेळेस उपस्थित होते. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

२२ जुलै रोजी सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे उच्चदाब वाहिनीचे दोन टॉवर पडल्याने महाड तालुक्यातील गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. तथापि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे २६ जुलै रोजी महावितरणच्या गोरेगाव स्विचिंग उपकेंद्रातून बॅक फिडर मार्फत २२ के.व्ही. लोणेरे फिडर द्वारे २२ के.व्ही वाहूर फिडर चालू करून ८० गावांचा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरू करण्यात आला असल्याचे डॉ राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

महावितरण,महापारेषणच्या कर्मचाऱ्यांचे कौतूक

महावितरण,महापारेषणच्या कर्तव्यदक्ष आणि धाडसी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरू केला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर वीज खाते करत आहे. नदी पात्रात मगरींचे वास्तव्य असताना देखील आमचे कर्मचारी पाण्यात पोहत वीज खांबावर चढून वीज यंत्रणा पुन्हा उभारणीचे काम करत आहेत. त्यांना मी सलाम करतो, त्यांच्या या कामगिरीमुळे आमची छाती अभिमानाने फुलून आली असे गौरवोद्गार डॉ राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांप्रति काढले. पूरग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक भाग प्रकाशमान केले आहेत. बाधित झालेल्या १३०८ वितरण रोहित्रांपैकी २६१, ४७१ पाणीपुरवठा योजनांपैकी २९ तर ८ कोविड हॉस्पिटल/ व्हॅकसीनेशन सेंटरपैकी ३, ८३ मोबाईल टॉवरपैकी १९ असे एकूण ३५,५६० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.

गरजूंना वस्तूंचे वाटप

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन,सबोर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन व काँग्रेस पक्षाच्या वतीने महाड येथील बौद्ध वाडी व अदिवासी वाडी येथे पूरग्रस्त गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वितरण डॉ राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – खंडणी आणि जमीन बळकावल्या प्रकरणी परमबीर सिंह यांच्या ५ निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -