महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पहिल्या तृतीयपंथी अंजली पाटील यांनी विजय मिळवला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर अंजली पाटील यांनी ही निवडणूक लढवली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला, तेव्हा तो कोणत्या श्रेणीत भरायचा, यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण थेट उच्च न्यायालयापर्यंत देखील गेलं होतं. अखेर न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला होता. आता त्यांनी विजय मिळवल्यामुळे जळगावमध्ये त्यांच्या नावावर एक नवा विक्रम नोंद झाला आहे. पहिल्यांदाच जळगावच्या कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये तृतीयपंथी उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे अंजली पाटील यांचा विजय सध्या जळगावमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
काय होता अंजली पाटील यांच्या अर्जाचा वाद?
अंजली पाटील उर्फ गुरू संजना जान यांनी भादलीच्या ४ क्रमांकाच्या वॉर्डमदून अर्ज भरला होता. त्यामध्ये लिंग निवडताना त्यांनी महिला निवडलं होतं. त्यावर इतर उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर यावरून वाद सुरू झाला. स्थानिक पातळीवर तहसिलदारांन इतर उमेदवारांचं म्हणणं ग्राह्य धरून अंजली पाटील यांना महिला श्रेणीमधून उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला होता. अखेर अंजली पाटील यांनी तहसिलदारांच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पाटील यांचा अर्ज वैध ठरवल्यानंतर त्यांचा अर्ज प्रशासनाने स्वीकार केला.