आषाढ महिना सरतो ना सरतो तोच हिंदू प्रथेनुसार श्रावण महिना सुरू झाल्याची चाहुल लागते. ताटातील मांसाहार गायब होऊन एक ते दीड महिना शुद्ध शाकाहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालेभाजी आणि फळभाज्यांना भरपूर प्रमाणात मागणी असते. यामुळे साधारण भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले असतात. यासाठी पावसाळ्यात रानमाळावर येणार्या रानभाज्यांमध्ये सर्वसामान्य खवय्यांची रूची असते. यामुळे येथील डोंगर पायथ्याशी वसलेल्या आदिवासी वाड्यांतील पुरुष-महिला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी बाजारपेठेत आणत असल्याने रानभाज्यांची आवक वाढल्याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळते.
श्रावणाची सुरुवात होताच रानभाज्यांची मागणी वाढल्याने जंगलातून, तसेच दरीखोर्यांतून आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भाज्या टोपल्याच्या टोपल्या भरून डोक्यावर घेऊन डोंगर दर्यांतील बिकट पायवाटा चढून शहरात विक्रीसाठी आणून आपली उपजीविका करीत असतात. रानभाज्या आरोग्यास गुणकारी, तसेच सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने खवय्यांकडून जास्त प्रमाणात खरेदी केली जातात. यामुळे रोजीरोटीसाठी शहरावर अवलंबून असलेल्या आदिवासी बांधवाचे जीवनमान उंचाविण्यास हातभार लागत आहे. यामुळे निसर्गाने देऊ केलेल्या या व्यवसायाला सुगीचे दिवस आलेले दिसत आहेत.
रोहा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत जागतिक आदिवासी दिनानिमित्त रोहा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. या महोत्सवात गावदेवी बचतगट, बापदेव बचतगट, वरदा खामजाई शेतकरी गट व इतर शेतकरी यांनी विविध रानभाज्यांसह सहभाग घेतला. यामध्ये भारंगी, कूडा, टाकळा, कैला, पेवा, दिंडा, बांबू, करटोली, कुरडू, केना, अळू, केळफूल, शेवगा, टाकळा, शतावरी अशा विविध ४० रानभाज्यांचा समावेश होता. प्रसंगी बचतगटांच्या स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली. नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात या रानभाज्या संपुर्णपणे नैसर्गिक असल्याने उत्तम आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत.
हेही वाचा – Break the chain : शॉपिंग मॉलमध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश, सुधारित आदेश जारी