घरताज्या घडामोडीरायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा 'ऑरेंज' अलर्ट

रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘ऑरेंज’ अलर्ट

Subscribe

पुढील तीन दिवस संपूर्ण सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे प्रशासनाला निर्देश तर जनतेला आवाहन केले आहे. 

हवामान खात्याने पुढील तीन दिवस रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘ऑरेंज’ इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील तीन दिवस कमालीची सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय जनतेने शासनाच्या सूचनांचे पालन करीत सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पुढील तीन दिवस होणाऱ्या संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर २९ ऑगस्टला ‘वेब एक्स’ या ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीद्वारे स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीबाबत संपूर्ण आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संपर्क यंत्रणा विस्कळीत झाल्यास पर्यायी व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे सांगून दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करावे, त्या ठिकाणी लोकांनी परत जाऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, सातारा जिल्ह्यातील पर्जन्यमानाची माहिती घेत राहावी, साधनसामुग्री सुसज्ज ठेवावी, अफवा पसरू नयेत यासाठी काळजी घ्यावी, महाड एमआयडीसी मधील कंपन्यांनाही सतर्क ठेवून तेथेही बचावकार्य तथा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी,अशा सूचना मांडल्या. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संपर्क यंत्रणा अबाधित राहणे याबाबतचे महत्व अधोरेखित करून वायरलेस यंत्रणा कार्यान्वित करणे, रिपीटर बसविणे, महाड येथे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे, रबर बोटी व इतर बचावकार्य याबाबतचे प्रशिक्षण देणे आदी विषयांबाबत महत्त्वाच्या सूचना मांडल्या.

- Advertisement -

सुरक्षिततेसाठी सूचना…

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी संभाव्य अतिवृष्टीनंतर किंवा दरड कोसळल्यानंतर उद्भवणार्‍या परिस्थितीबाबत केल्या जाणाऱ्या खबरदारीच्या उपाययोजनाबाबत संपूर्ण जिल्ह्याचा प्रांतनिहाय सविस्तर आढावा घेतला. याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी अत्‍यंत सतर्कता बाळगावी. मुख्यालय सोडू नये. मुख्यत्वे स्थानिक प्रशासनातील प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी कृषी अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी विशेष सजगता बाळगावी. डंपर, जेसीबी, पोकलेन, सर्चलाईट, रबर बोटी इतर महत्त्वाच्या साहित्य वितरण व्यवस्थेचे चोख नियोजन करावे. नागरिकांमध्ये संभाव्य अतिवृष्टी किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीबाबत जास्तीत जास्त जागृती करावी. जनतेला योग्य माहिती द्यावी. प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावरील भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी भरतीच्या वेळांची नोंद घेऊन त्याप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. दरडप्रवण क्षेत्रातील लोकांचे तातडीने स्थलांतर करावे. स्थलांतरित नागरिकांनी पुन्हा परतून त्या क्षेत्रात जाऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सतर्कता बाळगावी. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना व माहिती विविध प्रसारमाध्यमांमार्फत जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचविण्यात याव्यात, आपत्तीच्या वेळी सर्वांनी आपापसात आवश्यक तो समन्वय राखून ठरवून दिलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने नियोजनपूर्वक काम करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ऑनलाईन बैठकीला प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

या ऑनलाईन बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सचिव डॉ.पद्मश्री बैनाडे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम,औद्योगिक सुरक्षा, आरोग्य या विभागांचे अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘उघड दार उद्धवा’ म्हणत मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -