पोलादपूर तालुक्यातील डोंगराळ, दुर्गम भागातील शेतकर्यांनी तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत जास्तीचे उत्पन्न देणारे सगुणा तंत्रज्ञान वापरून भातशेती केली आहे.आज ते लाभदायक ठरल्याचे समोर येत असल्याने शेतकर्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शहरासह तालुक्यातील कृष्णा दगडू मोरे, रमेश बाबू येरूणकर, रवींद्र सुरवे, विश्वास कदम आणि इतर शेतकर्यांनी, तसेच पळचिल, किणेश्वर, निवे, कापडे, वाकण या गावात सगुणा तंत्रज्ञानाचा वापर करून भात लागवड करण्यात आली असून, याच तंत्रज्ञानांतर्गत एक मीटर पिकाच्या पट्ट्यामध्ये एक फूट मोकळी जागा सोडण्यात आली आहे. आजच्या घडीला ५५ फुटवे प्रति चूड पीक आले असून, लोंब्यांमधील दाणेही भरदार आहेत. या तंत्रज्ञानाने भातशेती केल्यास चिखलणी करावी लागत नाही. शेतीसाठी राबही तयार करावा लागत नाही. शेतमजूरांची बचत होत असल्यामुळे खर्च कमी होतो. स्वाभाविक नफा देणारी ही भातशेती असल्याने तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी गावोगावी शेतकर्यांच्या बैठका घेत या शेतीसाठी प्रोत्साहित करीत आहेत.
करंजे, आड, देवळे, कापडे, वाकण, कोतवाल बुद्रुक परिसरात भात पिकावर निळे भुंगेरे नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यासाठी लॉमडासाहलो प्रिन आणि आयएंझोफॉस या औषधांची फवारणी करण्याचे मार्गदर्शन पाटील यांनी केले. आता भात पिकावरील कीड नियंत्रणात आली असून, रोपे जोमदारपणे वाढीस लागली आहेत. सगुणा तंत्रज्ञान भात लागवडीची कास धरण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
वार्ताहर – बबन शेलार
हे ही वाचा – Rain Update : पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज