पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाड्यांतल्या नागरीकांना अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी रायगड जिल्हापरिषदेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत शुध्द पाणीपुरवठ्याची मागणी लावून धरली.दहा ते बारा वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे ५२ वर्ष जुन्या, नादुरुस्त आणि बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे या आदिवासीवाड्यांना पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी जलशुद्धीकरण प्रक्रियेविना पुरवले जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला. त्या रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना आजही शुद्ध पाणी मिळत नाही. पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी या गावांसह डोंगरीची वाडी, स्टेशनवाडी, फलटवाडी, चिंचेचीवाडी या आदिवासीवाड्यांतील नागरीकांची आजही पाण्यासाठी वणवण सुरु असल्याने या ग्रामस्थांनी आज सोमवारी २५ ऑक्टोबरला रायगड जिल्हा परिषद कार्यालयावर शेकडोच्या संख्येने मोर्चा काढून जिल्हा परिषद प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
अन्यथा बेमुदत उपोषण
राष्ट्रसेवा दलाचे रायगड जिल्हा संघटक संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. हातात हंडे, अशुद्ध पाण्याच्या बाटल्या, फलक घेऊन घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहोचला. जिल्हा डाक कार्यालयाजवळ मोर्चा पोलिसांनी अडविल्यावर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मोर्चातील प्रमुखांची भाषणे झाली. दरम्यान, मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे संतोष ठाकूर यांनी सांगितले. यापुढील काळात पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला नाही तर १७ नोव्हेंबरपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा ठाकूर यांनी दिला.
गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह अनेकांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे उपअभियंता, कार्यकारी अभियंता, पनवेल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. मात्र तरीही यात सुधारणा झाली नाही.
याआधीही १५ मार्च २०२१ रोजी पनवेल पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा १० जुलै २०२१ रोजी संबंधित अधिकार्यांनी लाडीवली गावास भेट देऊन नियमीत शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, तरीही शुध्द पाणी पुरवण्यात आले नाही. यामुळे १३ जुलै रोजी पुन्हा मोर्चा कढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर पाणी पुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले. यामुळे मोर्चा रहित करण्यात आला.
हे ही वाचा – T20 World Cup 2021: रोहित शर्मावर प्रश्न अन् पाकिस्तानी पत्रकारांवर संतापला विराट