शिवप्रभुंचे अतुलनीय शौर्याचे प्रतीक आणि हिंदू पतपादशाहीच्या गौरवशाली, वैभवशाली गाथेचा अजरामर साक्षीदार सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ला शनिवारी शेकडो मशालींनी उजळून निघाला. गडावर श्री भवानी मातेच्या नवरात्रोत्सवाला ३६१ वर्षे पूर्ण झाली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून हा उत्सव साजरा करण्यात येत असतो. यासाठी श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे मार्गदर्शन लाभते.
मशाल महोत्सवाचे आयोजन गडावरील हस्तकला प्रदर्शन केंद्राचे चंद्रकांत उत्तेकर यांनी केले असून, महोत्सवाचे ११ वे वर्ष आहे. नवरात्रोत्सवात सकाळी, संध्याकाळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. चौथ्या माळेच्या दिवशी मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
त्यानुसार श्री भवानी मातेची विधीवत पूजा आणि गोंधळ झाल्यानंतर रात्री ८ वाजता मशाल महोत्सवास सुरुवात झाली. यावेळी मानकरी, ठिकठिकाणाहून आलेले भाविक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी यांच्या हस्ते मशाल पेटवून महोत्सवाला सुरुवात झाली. गडावर सभोवताली आणि मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे प्रकाश कदम, विजय हवालदार, आनंद उतेकर, मृणाल उतेकर, संतोष जाधव आणि आणि ग्रामस्थांनी उत्सवासाठी परिश्रम घेतले.
वार्ताहर – बबन शेलार
हे ही वाचा – राज ठाकरे रस्त्यावर उतरणार, पुण्यात तळजाई टेकडीवरील प्रकल्पाच्या विरोधासाठी २४ ऑक्टोबरला आंदोलन