पाठपुरावा करीत मंजुरी मिळविलेल्या रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून टक्केवारी मागितली जात असल्याने हे काम रखडले. मात्र ठेकेदाराने कोणाच्याही धमकीला भीक न घालता रस्त्याचे काम सुरु करावे असा सल्ला देतानाच, या कामात जो कोणी आड येईल त्याला आडवा करण्याचे काम शेकापक्ष करेल, असा खणखणीत इशारा शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिला.अलिबाग-रामराज-रोहे रस्त्यासाठी आज १३ ऑक्टोबरला शेकाप पुरस्कृत पुरोगामी युवक संघटनेमार्फत रास्ता रोको आंदोलन खानाव नाका येथे करण्यात आले. आ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील या आंदोलनाचे नेतृत्त्व महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रस्त्याबाबत आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या आंदोलनाच्या दरम्यान सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता सुखदरे यांनी आंदोलनकर्त्यांना सामोरे जात रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
लवकरच ठेकेदाराकडून रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरम्यान, हा रस्ता गेले अनेक वर्षे खड्डेमय आहे. आ. पाटील यांनी या रस्त्यासाठी पुढाकार घेऊन तो तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंजूर करून घेतला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत रस्त्याच्या कामाचे राजकारण करून त्यावेळच्या सरकारने निविदा अडविल्याने शेकापचा पराभव झाला. निवडून आलेल्यांनी वल्गना करीत २५ तारखेपासून त्वरित रस्त्याचे काम स्वखर्चाने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अडीच वर्षे होऊनही काम अपूर्णच आहे. त्यामुळे शेकापने आंदोलनाचा पवित्रा घेत झारीतील शुक्राचार्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी नगरसेवक, सरपंच, सदस्य यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
हे ही वाचा – College Reopen : राज्यातील कॉलेज २० ऑक्टोबरपासून सुरु होणार, उदय सामंत यांची माहिती