घरताज्या घडामोडी२०१४च्या पराभवाला सोनिया आणि मनमोहन सिंग जबाबदार

२०१४च्या पराभवाला सोनिया आणि मनमोहन सिंग जबाबदार

Subscribe

प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्रात ठपका

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग कारणीभूत असल्याचा ठपका माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ‘द प्रेसिडेंशियल इयर्स’ या आपल्या पुस्तकात ठेवला आहे. या पुस्तकात मुखर्जी यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली आहे. हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकातील उपरोक्त उल्लेखामुळे काँग्रेस पक्षात वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस पक्षातील काही नेत्यांच्या मते २००४ च्या निवडणुकीनंतर मी पंतप्रधान व्हावे, असे वाटत होते. मला पंतप्रधान केले असते तर पक्षाचा एवढा दारूण पराभव झाला नसता, असे या नेत्यांना वाटत होते, असा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. आपण राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाचे राजकीय भान हरपले. सोनिया गांधी पक्षाचा कारभार सांभाळण्यात अपयशी ठरल्या आणि डॉ. मनमोहन सिंग यांचा खासदारांशी व्यक्तिगत संपर्कच संपला, असे मुखर्जी पुस्तकात म्हणतात. मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेसच्या अधोगतीविषयी अनेक उल्लेख केले आहेत. पुढील वर्षी बाजारात येणार्‍या या पुस्तकात २०१४ मधील काँग्रेसच्या पराभवाच्या कारणांचे विश्लेषण केले आहे.

- Advertisement -

राष्ट्रपती भवनातील प्रवासाचा उल्लेखही या पुस्तकात उतरवण्यात आला आहे. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या मृत्यूआधी ‘द प्रेसिडेन्शिअल इयर्स’ हे पुस्तक लिहिले होते. रूपा पब्लिकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक जानेवारी २०२१ पासून वाचकांसाठी उपलब्ध होईल. या वर्षी ऑगस्टमध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी मुखर्जी यांचे निधन झाले. पश्चिम बंगालमधील एका खेड्यातून देशाच्या राष्ट्रपती भवनापर्यंतचा त्यांचा प्रवास पुस्तकात मांडण्यात आला आहे. याशिवाय काँग्रेसची झालेली पडझड आणि पक्षात उद्भवणारे मतभेद यावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा वाद अजून सुटलेला नाही. यातच मुखर्जींच्या पुस्तकात झालेल्या टीकेने पक्षात पुन्हा वाद उफाळून येण्याची दाट शक्यता जाणकारांना वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -