घरताज्या घडामोडीकथालेखिका, कादंबरीकार सुमती क्षेत्रमाडे

कथालेखिका, कादंबरीकार सुमती क्षेत्रमाडे

Subscribe

सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे यांचा आज स्मृतिदिन. सुमती क्षेत्रमाडे या मराठी कथालेखिका, कादंबरीकार होत्या. त्यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील झापडे या गावी झाला. त्यांचे मूळ आडनाव रेगे परंतु क्षेत्रमाडे हा किताब मिळाल्याने क्षेत्रमाडे हे आडनाव त्यांनी धारण केले. वडील महसूल खात्यात निरीक्षक होते. सुमतीबाईंचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत नाशिक केंद्रात त्या मराठी विषयात सर्वप्रथम आल्या. त्यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची एल.सी. पी. एस ही वैद्यकशास्त्रातील पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी काही वर्षे बडोदे संस्थानात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले.

त्या वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला गेल्या (१९४८). तिथे रोटंडा विद्यापीठाची बालरोग आणि प्रसूतिशास्त्रातील एल.एम. ही पदवी घेऊन त्या भारतात परतल्या (१९५०). त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथे खासगी दवाखाना सुरू केला. अखेरपर्यंत त्यांचे वास्तव्य कोल्हापुरातच होते. वैद्यकीय सेवा करीत असतानाच त्यांनी आपला लेखन-वाचनाचा छंद जोपासला आणि कथा-लेखनास सुरुवात केली. त्यांची ‘वादळ’ ही पहिली कथा स्त्री मासिकात प्रसिद्ध झाली. पुढे स्त्री व माहेर मासिकांतून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. नंतर त्या कादंबरी लेखनाकडे वळल्या.

- Advertisement -

सुमतीबाईंनी विपुल लेखन केले. त्यांचे वीस कथासंग्रह, पंधरा कादंबर्‍या, कुमार वाङ्मय व दोन नाटके असे विविध साहित्यप्रकारांना स्पर्श करणारे लेखन आहे. या साहित्यसंपदेपैकी ‘प्रीतिस्वप्न’ (१९५४), ‘बीजेची कोर’ (१९६२) हे कथासंग्रह, ‘महाश्वेता’ (१९६०), ‘मैथिली’ (१९६३), ‘श्रावणधारा’ (१९६४), ‘मेघमल्हार’ (१९६८), ‘अनुहार’ (१९७६), ‘युगंधरा’ (१९७९), ‘वादळवीज’ (१९८१), ‘पांचाली’ (१९८४), ‘तपस्या’ (१९८४) इत्यादी कादंबर्‍या आणि ‘भैरवी’ (१९६८) व ‘मीच जाहले माझी मृगया’ (१९८७) ही नाटके, या साहित्यकृती उल्लेखनीय आहेत. त्यांनी युरोपचा स्वेच्छा दौरा केला होता (१९७२). अशा या श्रेष्ठ लेखिकेचे ८ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -