काही दिवसांपूर्वी एका मांजरीला जाळण्याची घटना मुंबईत घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा विकृतीचा कळस ठाणे शहरात घडला आहे. ठाणे येथील कॅसल मिल भागात एका भटक्या श्वानाला जिवंत जाळून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिटिजन फॉर Animal प्रोटेक्शन (कॅप) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस सध्या शोध घेत आहेत.
एका भटक्या कुत्र्याला जाळून त्याची हत्या केल्याची माहिती ‘कॅप’ या संस्थेला मिळताच या संस्थेतील सदस्य अथर्व प्रभावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची पाहणी केल्यानंतर त्यांना श्वान मृतावस्थेत आढळून आला. ते म्हणाले की, ‘गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा श्वान आजारी होता. त्याच्यावर उपचार करुन त्याला सोडण्यात आले होते. परंतु, त्या श्वानाला जाळून हत्या केल्याचे पाहून संघटनेने संताप व्यक्त केला आहे’.
आठवड्याला दोन तक्रारी येतात
कॅप ही संस्था गेली अनेक वर्षांपासून भटक्या प्राण्यांकरता काम करत आहे. भटक्या प्राण्यांवर अत्याचार किंवा त्यांची हत्या होत असल्याच्या घटना आठवड्याला एकदा ते दोनदा घडत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या जातात. यामध्ये श्वान आणि मांजरींवर अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – धक्कादायक: वडिलांनी घेतला मुलीच्या बलात्काराचा बदला, केली सहा जणांची हत्या