घरठाणेनिकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना ठाणे पालिका आयुक्तांचा दणका

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना ठाणे पालिका आयुक्तांचा दणका

Subscribe

कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे.

ठाणे : कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. तसेच, या काळात त्यांना ठाणे महापालिकेच्या इतर कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचबरोबर, या कामाची पर्यवेक्षणीय जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाबवण्यात आली आहे. (Thane Municipal Commissioner slams substandard contractors)

खड्डेमुक्त ठाण्याचे अभियान हाती घेतलेल्या ठाणे महापालिकेने रस्त्यांच्या कामाचे निरिक्षण सुरू केले आहे. आयुक्त बांगर हे अचानक भेटी देऊन कामांची पाहणी करत आहेत. रस्त्याच्या कामांच्या तांत्रिक दर्जाबाबत तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन त्यानुसार कारवाई करण्यात येईल. प्रत्येक खड्ड्यापाठी (प्रती एक चौरस मीटर) एक लाख रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

- Advertisement -

ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे अष्टविनायक चौक येथे गेले काही महिने रस्त्याचे काम सुरू होते. स्थानिक नागरिकांचे या कामाकडे बारीक लक्ष होते. रस्त्याचे काम कमी दर्जाचे होत असल्याचे तेथील एका नागरिकाने महापालिका आयुक्त बांगर यांच्या निदर्शनास आणून दिले. काम खराब होत असल्याची त्या नागरिकाने तक्रार केली.

संबंधित कामाची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंत्याला आयुक्तांनी पाहणी करण्यास सांगितले. त्यावर, कंत्राटदाराने न सांगताच हे काम केले आहे. शिवाय त्याची आता दुरुस्तीही केली आहे, असा अहवाल सादर केला. मात्र, तक्रारदाराने त्याचा पाठपुरावा कायम ठेवला. कामाच्या दर्जाबाबत त्याचे म्हणणे कायम राहिल्याने, आयुक्त बांगर यांनी अष्टविनायक चौक येथील रस्त्याच्या कामाला अचानक भेट दिली. या भेटीत, रस्त्याचे काम योग्य दर्जाचे नसल्याचे त्यांच्याही निर्दशनास आले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आयुक्तांची भेट घेतली. कामाच्या दर्जाबद्दल त्यांना वाटणारी चिंता त्यांनी आयुक्तांकडे व्यक्त केली. तसेच, अनेकदा तक्रारी करूनही संबंधितांनी त्यात लक्ष न घातल्याची खंतही व्यक्त केली.

- Advertisement -

या रस्त्याचे काम मास्टिक प्रकारचे असून या कामात डांबराचे तापमान योग्य न राखल्यास रस्त्याचा पृष्ठभाग लवकर उखडतो. परंतु, तांत्रिकदृष्ट्या योग्य काम झाल्यास किमान दहा वर्षे हा रस्ता खड्डेमुक्त राहू शकेल, अशी खात्री दिली जाते. अष्टविनायक चौकातील मूळ रस्ता खराब झालाच, शिवाय त्याची दुरुस्तीही नीट झाली नाही. याची दखल घेत, त्या कंत्राटदाराला खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले. कंत्राटदाराने असमाधानकारक खुलासा केला. त्यामुळे त्याला काळ्या यादीत का टाकू नये, अशी नोटीस बजावण्यात आली.

या नोटीशीच्या उत्तरात त्याने मूळ काम आणि त्याची दुरुस्ती खराब असल्याचे मान्य केले. त्यामुळे, एकंदर हे काम करताना कंत्राटदाराचा हेतू प्रामाणिक नसल्याच्या निष्कर्षाप्रत महापालिका प्रशासन आले. नागरिकांनी तक्रार केली नसती तर रस्त्याची दुरूस्तीही झाली नसती.

या पार्श्वभूमीवर, कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकणे, तसेच, ठाणे महापालिकेच्या इतर निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून प्रतिबंध घालण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. संबंधित कामाच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलत्या ठाण्याचे अभियान यशस्वी करण्यासाठी महापालिकेस आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितले आहे. खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता मोहीम, सुशोभीकरण या कामांच्या बाबतीत कार्यवाहीचा अहवाल मा. मुख्यमंत्री सातत्याने जाणून घेतात. रस्त्यांसाठी त्यांनी ठाणे महापालिकेस एकूण ६०५ कोटींचे सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे, रस्त्याच्या कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा या कारवाईद्वारे महापालिका प्रशासनाने दिला आहे.


हेही वाचा – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी व्यक्त केला घातपाताचा संशय; पोलिसांत तक्रार दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -