घरताज्या घडामोडीदिवेआगारात विकसित होणार समुद्र किनारा, अजितदादांनी मागविला प्रस्ताव

दिवेआगारात विकसित होणार समुद्र किनारा, अजितदादांनी मागविला प्रस्ताव

Subscribe

दिवेआगरचा सुवर्ण गणेश अखेर ९ वर्षांनी विराजमान झाला असून, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली.

अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून आज २३ नोव्हेंबरला दिवेआगारचे वैभव असलेल्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा तब्बल ९ वर्षानंतर पार पडला. म्हणूनच आजचा दिवस दिवेआगारवासियांसाठी सुवर्ण क्षण मानला जात आहे. येथील चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याच्या प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सपत्नीक सुवर्ण गणेशाची पूजा करण्याचा मान मिळाला.सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याची चोरी झाल्यापासून ते त्या मुखवट्याची पुनःप्रतिष्ठापना होईपर्यंत ज्या व्यक्तींनी आपले प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या योगदान दिले, त्या सन्मानमूर्तींचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे जेष्ठ प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या अभंगवाणीने करण्यात आली.  या सोहळ्याप्रसंगी अजित पवार यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे मांडले असून,दिवेआगर समुद्रकिनारा विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव मागविला आहे.

- Advertisement -

 

रायगडचा भौगोलिक दृष्टीने विकास होणार…

अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज हा सुवर्ण दिन आपल्या सर्वांना पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्राच्यादृष्टीने कोकण आणि कोकणवासियांचा विकास अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून कोकणचा विकास साध्य करण्यासाठी हे शासन सदैव प्रयत्नशील आहे. दिवेआगार ग्रामपंचायत व ग्रामसचिवालय कार्यालयासाठी एक कोटी रुपये निधीची घोषणा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलोत्पादन योजनेचे यश हे खरंतर कोकणवासियांमुळेच पाहायला मिळाले आहे. राष्ट्रीय गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. एसटी कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. रायगडच्या भौगोलिक दृष्टीने येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी स्थापित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, शासन या कामात सर्व प्रकारचे सहकार्य करीत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये करावयाच्या मदतीबाबत एनडीआरएफच्या निकषांमध्ये काही बदल काही सुधारणा आवश्यक आहेत, त्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत. रायगडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होत आहे. त्याचबरोबर फळप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तसेच कृषी पर्यटन धोरण, समुद्रकिनाऱ्यावरील बीच शँक, निसर्ग पर्यटन धोरण, शामराव पेजे महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद,अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा विकास, जेट्टी विकास कार्यक्रम, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, मॉडेल आश्रमशाळा, वसई-विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर, अशा विविध विकास कामांविषयी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आश्वासक भाष्य केले. दिवेआगर समुद्रकिनारा विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, त्याचबरोबर कोरोनाबाबत दुसऱ्या लससाठी प्रभावी मोहीम राबवावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना यावेळी केल्या.

- Advertisement -

 

कोकणात पर्यटनासह शैक्षणिक विकासही होणार :  उदय सामंत

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कोकण विभागातील विकासकामांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे सहकार्य मिळत असून महाविकास आघाडीचे हे शासन राज्यातील प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहिले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असून आता कोकण विभागात पर्यटनाबरोबरच शैक्षणिक विकासासाठीही उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मिळणारे मार्गदर्शन हे अनमोल आहे, या शब्दात त्यांच्याप्रती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 

दिवेआगरमध्ये पर्यटनाला पुन्हा एकदा उभारी मिळणार : सुनील तटकरे

याप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी आजचा अंगारकीचा योग विशेष आहे. गेली ९ वर्षे दिवेआगार येथील सुवर्ण मुखवट्याच्या चोरीच्या घटनेनंतर येथील अंगारकी चतुर्थी उत्साहात साजरी होऊ शकत नव्हती. मात्र आजच्या या सोहळ्याने येथील नागरिकांमध्ये पूर्वीचा उत्साह पुन्हा संचारला आहे. दिवेआगार येथील पर्यटनाला पुन्हा एकदा उभारी मिळण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी शासनाकडून आम्हाला बळ मिळत आहे असे सांगून श्रीवर्धन तालुक्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली आहे, त्यासाठी महाविकास आघाडी शासन विशेष प्रयत्नशील आहे. येत्या काही काळात सागरी महामार्गाचा विकास, कोकण विभागातील समुद्रकिनाऱ्यांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास अशा विविध माध्यमातून कोकणचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. चिपी विमानतळामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणातील अनेक भागात पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे पर्यटन व्यवसाय आता बहरु लागला आहे. दिवेआगर येथील साडेचार किलोमीटरचा समुद्रकिनारा विकसित केल्यास येथील पर्यटनही विकसित होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काय आहे सुवर्ण मंदिराचा इतिहास ?

रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे सन १९९७ साली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी एका नारळ पोफळीच्या बागेत सुवर्ण गणेशाची मूर्ती सापडली आणि जिल्ह्यातील दिवेआगार हे ठिकाण प्रसिद्धी झोतात आले. सुवर्ण गणेश पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी सुरू झाल्यामुळे येथील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळाली. मात्र सन २०१२ साली येथील सुवर्ण गणेश मूर्तीच्या सोन्याच्या मुखवट्याची चोरी झाली आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेले येथील वैभव लयास गेले. तब्बल ९ वर्षांचा काळ लोटल्यानंतर रायगड पोलीस, विविध शासकीय यंत्रणा आणि स्थानिक पत्रकार या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे आज मंगळवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने शासकीय अधिकाऱ्यांच्या, पोलीस प्रशासनाच्या, स्थानिक पत्रकार आणि नागरिकांच्या साक्षीने सुवर्ण गणेशाच्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. यामुळे पुन्हा एकदा दिवेआगार पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. येथे चोरीसारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून या ठिकाणी रायगड पोलीस दलामार्फत पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. या नूतन पोलीस चौकीचे उद्घाटन देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, तसेच पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून २ कोटी रुपये खर्च करून नळपाणी योजना मंजूर करण्यात आली असून यावेळी या योजनेचे देखील अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमीपूजन पार पडले.

 


हे ही वाचा :  Ramayana Circuit Train : अखेर रामायण एक्सप्रेसमधील वेटर्सच्या साधू संतांसारख्या पेहरावात बदल; काय झाला वाद ?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -