रोहेकरांचे नव्हे तर तमाम रायगडवासीयांसाठी आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेले ‘सीडी’ उपाख्य चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांच्या नावाने उभारण्यात आलेले प्रवेशद्वार दुरवस्था झाल्यानंतर उपेक्षितच ठेवण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, ‘सीडीं’चे नाव घेतल्याशिवाय भाषण पूर्ण न करू शकणारे लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून शहराच्या या सुपुत्राची कारकीर्द उल्लेखनीय आहे. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री अशी ओळख असलेल्या देशमुख यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोरच महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले आणि पुढे त्यांनी पदाचा राजीनामाही दिला. त्यांच्या राजीनाम्याने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक मजबूत झाली. स्वर्गीय प्र. के. अत्रे यांनी देशमुख यांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचा कंठमणी’ असा केला होता. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण रोह्याप्रमाणे नाते (महाड) आणि तळे येथेही झाले. कोकणी संस्कृतीवर प्रचंड प्रेम असलेल्या देशमुख यांनी लंडनमधील आपल्या बंगल्याला ‘रोहा’ असे नाव दिले आहे.
1943 :: C.D. Deshmukh Became First Indian To Be Appointed Governor , Reserve Bank of India pic.twitter.com/bRiZhYMzIA
— indianhistorypics (@IndiaHistorypic) June 18, 2016
माजी नगराध्यक्ष कै. दिलीप राजे यांच्या पाठपुराव्यानंतर नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांच्या कारकिर्दीत खारापटी-रोहे मार्गावर अष्टमी येथे प. पू.पांडुरंग शास्त्री आठवले, तर रोहे कोलाड मार्गावर दमखाडी येथे डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. कालांतराने नगर परिषदेने रोहे-चणेरे मार्गावर खारी येथे थोर निरुपणकर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारले. प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या नावाचे प्रवेशद्वारही देखण्या स्वरुपात उभे आहे. मात्र रोहेकरांच्या गळ्यातील ताईत असलेले सी. डी. देशमुख यांच्या नावाचे प्रवेशद्वार दुर्लक्षित आणि उपेक्षित ठेवण्यात आल्याने त्यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून पुन्हा एकदा भव्य प्रवेशद्वार उभारावे, अशी मागणी केली जात आहे.
या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद मोरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रवेशद्वाराजवळ पिण्याच्या पाण्याची वाहिनी असल्याने काम थांबल्याचे सांगितले. सध्या असलेला लोखंडी सांगाडा काढून आणि काहीसे वेगळे डिझाईन तयार करून नव्याने प्रवेशद्वार उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमोल पेणकर – रोहे
हे ही वाचा – स्वतंत्र भारताचे पहिले अर्थतद्न्य