राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत एकूण १५३ करोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, राज्यात आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दरम्यान, पीडी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ८५ वर्षीय करोनाबाधित डॉक्टरचाही मृत्यू झाल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेहाचा त्रास होता. तसेच, त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे सैफी हॉस्पिटलमधील लॅबमध्ये कोव्हिड १९ चे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी माहिमच्या पीडी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांचा तिथेच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील मृत्यूंचा आकडा ६ झाला आहे. दरम्यान, राज्यात एकाच दिवसांत २८ कोविड १९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे, राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये इस्लामपूर सांगली मधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा तर नागपूरमधील गुरुवारी बाधित आलेल्या रुग्णांच्या ४ सहवासितांचा समावेश आहे. याशिवाय, प्रत्येकी २ रुग्ण मुंबई आणि ठाणे येथील असून पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. तर, १ रुग्ण गुजरात राज्यातील आहे.
सांगलीतील एकाच कुटुंबातील १५ नवे करोना रुग्ण
सांगलीतील एकाच कुटुंबातील १५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे, सांगली जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ११ वरुन २४ वर पोहोचली आहे. इस्लामपूरमधील हे कुटुंब असून एकाच कुटुंबातील १५ जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या तपासणीचा अहवाल शुक्रवारी मिळाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. शिवाय, या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या आणखी एका महिलेला करोनाची बाधा झाली आहे. सांगलीतील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातल्या १५ जणांना करोनाची लागण झाली आहे. ज्या भागात हे लोक राहतात तो भाग बंद करण्यात असल्याचं ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. तसंच, या कुटुंबातील एकाच व्यक्तीला बाहेर पडता येईल. त्याच्या हातावर शिक्का मारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरातील एका कुटुंबातील चौघे सौदी अरेबियातील हज यात्रेला गेले होते. १३ मार्च या दिवशी हे परतले. त्यांना १४ दिवसांचं होम क्वॉरंटाईन करण्यात सांगण्यात आले होते. या कुटुंबातील ३५ जणांसोबत त्यांचा संपर्क आला. त्यातीलआधी १८ जणांना शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातील चौघांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर बुधवारी आणखी ५ जणांचा पॉझिटिव्ह आला. गुरुवारी रात्री दोघांच्या पॉझिटिव्ह अहवालानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर मिरज येथील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
डिस्चार्ज देण्याचे प्रमाण वाढले
दरम्यान, करोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांच्या डिस्चार्जची देखील संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात रुग्णांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. ४ हजारांपेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या आहे. त्यातच १९ रुग्णांना डिस्चार्ज केलं आहे. १४ दिवस तुमच्यात लक्षणं दिसतात. त्यानंतर, २४ तासांत २ टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज केलं जातं. त्यामुळे, डिस्चार्जची संख्याही वाढेल असाही विश्वास टोपेंनी व्यक्त केला आहे. दरम्यान एकीकडे राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना देशातील रुग्णसंख्या ७०० वर पोहोचली आहे. तर, २० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात शुक्रवारी एकूण २५० जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३४९३ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३०५९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २२ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६, ५१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १०४५ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. तर, मुंबईसह उपनगरातील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दिवसभरात ९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.