घरताज्या घडामोडीबॉलिवूड युपीला नेणार नाही इतरांनी चिंता करू नये

बॉलिवूड युपीला नेणार नाही इतरांनी चिंता करू नये

Subscribe

मुंबईच्या दोन दिवसीय दौर्‍यावर असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडामध्ये १ हजार हेक्टरवर नवी फिल्मसिटी उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. बॉलिवूडची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याचा काही प्रश्नच नाही. फिल्मसिटी ही खुली प्रतिस्पर्धा आहे. प्रत्येक राज्याला प्रगती करण्याचा हक्क आहे. आम्ही जागतिक सुविधा देणारी नवी फिल्मसिटी उभारणार आहोत. त्यामुळे इतरांनी चिंता करण्याचे कारण नाही, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला लगावला आहे.

मुंबई बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आदित्यनाथ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशात गुंतवणूक करणार्‍यांशी गेल्या दोन दिवसांत चर्चा केल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. गुंतवणूकदार उत्तर प्रदेशात आणखी गुंतवणूक करण्यास इच्छुक असून जागतिक दर्जाच्या सुखसोयी देणार्‍या फिल्मसिटीच्या निर्मितीसाठी अनेकांशी चर्चा झाल्याचं आदित्यनाथ म्हणाले. कोरोना काळात देखील उत्तर प्रदेशात गुंतवणुकीत चांगली वाढ झाली आहे. यासोबतच कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे उत्तर प्रदेशात उद्योगांना चालना मिळेल, असेही ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे कॉर्पोरेट हब म्हणून ओळख मिळवलेल्या नोएडामध्ये नवी फिल्मसिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी १ हजार हेक्टर इतकी जागा निश्चित करण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. नवी फिल्मसिटी आग्रा, मथुरा आणि दिल्लीहून प्रवासासाठी सोयीस्कर ठरेल असे सांगतानाच या फिल्मसिटीत आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आदित्यनाथ म्हणाले.

उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे सामाजिक सुरक्षेत चांगली वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील उद्योगधंदे देखील वाढत आहेत, असा दावा योगींनी यावेळी केला. कोरोना काळात देखील तरुणांना १ कोटींचा रोजगार देणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

पाकीट मारण्याइतकी सोपी गोष्ट नाही
बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईबाहेर नेणे म्हणजे एखाद्याच्या खिशातले पाकीट मारण्याइतकी सोपी गोष्ट आहे का, असा मिश्किल सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांना विचारला. मी काहीही हिसकावून घेण्यासाठी मुंबईत आलेलो नाही. ही केवळ एक स्पर्धा आहे. ज्यामध्ये चित्रपटसृष्टीला चांगल्या सुविधा आणि सामाजिक सुरक्षा कशाप्रकारे पुरवता येईल, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आम्हाला मुंबईतील लोकांच्या अनुभवाचा लाभ घ्यायचा आहे. जेणेकरून उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाच्या सुविधा उभारणे शक्य होईल. त्यासाठी मी चित्रपटसृष्टीतील लोकांशी संवाद साधला, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -