राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक महत्वाच्या अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. परंतु, यावरून आता विरोधकांकडून सत्ताधा-यांवर निशाणा साधण्यात आला आहे. १४ मार्चला सुप्रीम कोर्टाकडून राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते लक्षात ठेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असा टोला अजित पवारांकडून लगावण्यात आला आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अर्थसंकल्प सादर होत असताना १४ मार्च डोळ्यासमोर येत होते. बहुतेक १४ मार्चचा सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाणार हे यांना कळाले आहे आणि त्यामुळेच यांनी अर्थसंकल्पात शक्य होईल, तितकी घोषणा या सरकारकडून करण्यात आली आहे, असा टोला अजित पवारांनी लगावला.
शिक्षक पदवीधर मतदारसंघात देखील शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. याबाबतचे उदाहरण देताना अजित पवार म्हणाले की, मागील निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. कसब्यात आलेले अपयश आणि चिंचवड निवडणुकीत देखील दोघांचे मत एकत्र करून भाजपपेक्षा अधिक मते होत आहेत. त्यामुळेच तिथे झालेली परिस्थिती पाहून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. तसेच खेडमध्ये झालेली सभा, वरळीत आदित्य ठाकरे यांची झालेली सभा याचा धसका घेऊन होत नव्हतं ते जाहीर करून टाका, पुढचं पुढे बघू असे म्हणत या सरकारने अर्थसंकल्प सदर केला आहे, असेही अजित पवार यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा – अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे; अजित पवारांची खोचक टीका
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या १४ मार्चला पुढील सुनावणी करण्यात येणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर राज्यात नुकतीच पार पडलेली कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक सुद्धा शिंदे-भाजप सरकारला डोईजड गेल्याचेच दिसून आले. त्यामुळे या सरकारने जनतेची दिशाभूल करण्यासाठीच अशा पद्धतीचा अर्थसंकल्प सादर केला आहे, असे मत विरोधकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.