मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर झाले असून या अर्थसंकल्पात महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजेनेतील विमा संरक्षण मर्यादा 1.50 लाखांहून आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आल्याची माहीती राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना दिली.
या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून आता 5 लाख रुपये करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत राज्यातील दारिद्ररेषेखालील लोकांना उपचार घेणे सोपे जाणार असून 200 नवीन रुग्णालयांचा या योजनेत समावेश केला आहे. याशिवाय मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची संरक्षण मर्यादा 2.40 लाखांहून 4 लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात 700 दवाखाने उघडण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा – अर्थसंकल्प 2023 : महिलांच्या पदरात काय पडलं? वाचा एका क्लिकवर
निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य
संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेतील अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये करण्यात आले आहे. याशिवाय, राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार असून प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच नियमित प्रदान केले जाणार आहे, असे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना?
महाराष्ट्र राज्यातील दारिद्ररेषेखालील विशेष करुन पिवळ्या रेशनकार्ड धारकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने 2 जूलै 2012 रोजी राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये राजीव गांधी जीवनदायी जनारोग्य योजना सुरु केली होती. पुढे राज्यातील 28 जिल्ह्यांत या योजनेचा 21 नोव्हेंबर 2013 ला विस्तार करण्यात आला. त्यानंतर या योजनेचे ‘महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना’ असे नाव बदलण्यात आले. सध्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना होत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे रेशनकार्ड, अत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना तसेच केशरी रेशनकार्ड असणे गरजेचे आहे.
हेही वाचा – लेक लाडकी योजनेतून प्रत्येक मुलीला मिळणार लाखो रुपये, फडणवीसांची मोठी घोषणा