शिवसेना (शिंदे गट)-भाजप यांच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन पुढील एक महिना सुरु राहणार आहे. या अधिवेशनाला नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले आमदार सत्यजित तांबे हे देखील हजर राहिले आहेत. यावेळी त्यांनी एक ट्विट करून अधिवेशनाबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे हे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले. सत्यजित तांबे यांनी शिक्षक पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल करताच त्यांचा विजय निश्चित असे बोलले जात होते आणि झाले देखील तसेच सत्यजित तांबे हे या मतदारसंघात विजयी झाले. सत्यजित तांबे हे विजयी झाल्यानंतर त्यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावली. अधिवेशनाच्या थोड्याच वेळात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सत्यजित तांबे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सत्यजित तांबे यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, “जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घालमेल शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज विधानभवनात सदस्य म्हणून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आहे. तसेच माझे आई-वडील-मामा, माझे सर्व मित्र, माझे मतदार, सर्व ज्येष्ठ नेते यांच्या आशीर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करीत आहे.”
जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घाळमेळ शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज विधानभवनात सदस्य म्हणून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आहे.
माझे आई-वडील-मामा,माझे सर्व मित्र,माझे मतदार, सर्व ज्येष्ठ नेते यांच्या आशिर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करीत आहे.#अर्थसंकल्पीय_अधिवेशन pic.twitter.com/uKVixo1Yyk— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 27, 2023
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत सत्यजीत तांबे हे चर्चेत राहिले होते. कधी नव्हे ते पहिल्यांदा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली. ज्यामुळे जनतेला इतर निवडणुकांप्रमाणे अगदी जवळून ही निवडणूक अनुभवता देखील आली. या निवडणुकीमध्ये राज्यातील अनेक राजकीय नाट्ये उघड झाली. काँग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस सुद्धा यामुळे चव्हाट्यावर आली. पण विजयी होताच सत्यजित तांबे यांनी मतदारसंघात जाऊन जनतेचे आणि मतदारांचे आभार मानले. यानंतर त्यांनी सर्व मतदारांचे, सर्व मित्रांचे आभार मानले. नुकतेच त्यांनी जेजुरी, मोरगाव, बाबीर (इंदापूर), पंढरपूर, तुळजापूर, अक्ककोट व गाणगापूर आदी ठिकाणी जाऊन सहकुटुंब दर्शन घेतले.
हेही वाचा – राज्यपालांच्या अभिभाषणातून जनतेची दिशाभूल, आदित्य ठाकरेंची टीका
दरम्यान, आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे हे विधानभवनात उपस्थित राहिले. यावेळची स्थिती, त्यांना नेमके काय वाटत आहे हे त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून मांडलं. जसं शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या मनाची घालमेल असते, अगदी तशी स्थिती आज विधानभवनाच्या पायरी चढताना जाणवल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कुटुंबीय, बाळासाहेब थोरात, सर्व मित्र, मतदार, ज्येष्ठ नेते यांचे आभार मानत कामकाजाला सुरुवात करत असल्याचे म्हटलं आहे.