नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) बाजारातून 2000 रुपयांच्या (₹ 2000 Note) नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा 30 सप्टेंबर 2023पर्यंत वापरता येणार आहेत. यादरम्यान बँकांमध्ये जाऊन या नोटा बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत सूचनापत्र जारी केली आहे. 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेण्यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही, असे एसबीआयने त्यात म्हटले आहे. त्यामुळे एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन सहजपणे नोटा बदलता येतील.
SBI clarifies that the facility of exchange of Rs 2000 denomination bank notes upto a limit of Rs 20,000 at a time will be allowed without obtaining any requisition slip pic.twitter.com/TP6t2n9oeJ
— ANI (@ANI) May 21, 2023
आरबीआयच्या माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली असली तरी सध्या बाजारात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार आहेत. या नोटा 30 सप्टेंबर 2023पर्यंत वैध राहतील. 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या दरम्यान नोटा बदलून घेता येतील. एसबीआयने जारी केलेल्या सूचनापत्रानुसार, 2,000 रुपयांच्या 20,000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज भासणार नाही. अशा परिस्थितीत नोटा बदलून घेताना ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.
हेही वाचा – नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावे; राहुल गांधींचा पंतप्रधानांना विरोध
नोव्हेंबर 2016मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नोटाबंदीनुसार 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आरबीआयने 2000 हजार रुपयांची नोट चलनात आणली. 2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही.
विरोधकांची टीका
आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी टीकेची झो़ड उठवली. आमचे नेते आधी कृती करतात, नंतर विचार करतात. आपल्या स्वयंघोषित विश्वगुरूंचे हे वैशिष्ट्य असल्याची टीका काँग्रेसने केली. म्हणूनच आम्ही म्हणतो की, पंतप्रधान सुशिक्षित असावा, असे टोला आम आदमी पार्टीने लगावला. तर, काही लोकांना त्यांची चूक उशिरा समजते. 2000 रुपयांच्या नोटेच्या बाबतीतही असेच घडले आहे, अशी टीका समाजवादी पार्टीने केली.