अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याऐवजी वाढवून साडेबारा टक्के केल्यामुळे भारतातील दागिने उत्पादक आणि दागिने निर्यातदार हैराण झाले आहेत. यामुळे भारतातील हा व्यवसाय शेजारच्या राष्ट्रात स्थलांतरित होण्याचा धोका असल्याचा इशारा उत्पादकांनी दिला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना सोन्याच्या आयात शुल्कात 2.5 टक्क्यांनी वाढ करून ते 12.5 टक्केे इतके केले आहे. अगोदर आयात शुल्क 10 टक्के असल्यामुळे सोन्याची तस्करी वाढली असतानाच आता आयात शुल्कात वाढ केली आहे, असे जीजेपीसीआय या निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी सांगितले. हा उद्योग कठीण परिस्थितीतून जात असल्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक कमी होण्याबरोबरच रोजगार कमी होत आहे. आता या उद्योगाला पुन्हा एक धक्का बसला असून यामुळे भारतातील या उद्योगांचे स्थलांतर होण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात निर्माण होणारे दागिने महाग होणार असल्यामुळे भारतातून निर्यात कमी होईल. जे परदेशी पर्यटक भारतात दागिने खरेदी करतात ते इतर देशातून दागिने खरेदी करू लागतील. हिर्यावरील आणि इतर प्रक्रिया भारताऐवजी आणि व्हिएतनामकडे जातील. सरकारने आणखीही या विषयावर सकारात्मक निर्णय घ्यावा.
जागतिक सुवर्ण परिषदचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी आर म्हणाले की, सोन्याच्या किमती अगोदरच जास्त असताना एक मालमत्ता म्हणून सोन्याची बाजारपेठ विकसित होण्यात या वाढीव शुल्कामुळे अडचणी येणार आहेत. याच कारणामुळे दागिन्यांची निर्यात 5.5 टक्क्यांनी कमी होऊन ती केवळ 31 अब्ज डॉलर झाली होती. त्याचबरोबर सरलेल्या वर्षात सोन्याची आयात 3 टक्क्यांनी कमी होऊन ती ते 33 अब्ज डॉलर एवढी झाली होती या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.