मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने इतिहासात पहिल्यांदाच ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी व्यवहार सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच शेअर बाजाराने उसळी घेत ५० हजारांचा टप्पा ओलांडला तर ४० हजारांवरुन ५० हजारांपर्यंतचा टप्पा ओलांडण्यासाठी बीएसईला तीन महिन्यांचा कालावधी लागला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सकारात्मक बदल यामुळे भारतीय शेअर बाजाराने एक नवा विक्रम रचला आहे. शेअर बाजाराची ऐतिहासिक कामगिरीनंतर देशाच्या शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदाच असे घडले असून गुंतवणूकदारांसाठी ही एक नवी संधी निर्माण झाली आहे. अमेरिकन शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. त्याचा परिणाम म्हणून जगातल्या इतर शेअर मार्केटमध्येही तेजी पहायला मिळाली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारानेही ५० हजारचा स्तर पार केल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजून २४ मिनीटांनी सेन्सेक्स २६६.९६ अंकानी उसळला आणि ०.५४ टक्क्यांनी वाढून तो ५०,०५९.०८ वर पोहचला आहे. मुंबई शेअर मार्केटमधील टॉप ५० शेअर्स असणारा इंडेक्स निफ्टी ७९.१० अंकानी उसळला. यामध्ये ०.५४ टक्क्यांची जबरदस्त तेजी पहायला मिळाली. निफ्टीनेही १४,७२३.८० चा टप्पा गाठला आहे. जेके टायरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ९ टक्क्यांनी वाढ झाली असून सेन्सेक्सच्या ३० पैकी २७ समभाग तेजीत उघडले. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स साधारण ४ आणि ३ टक्क्यांनी वधारले. डिसेंबर महिन्याच्या तिमाहीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या कंपन्यांचे समभाग तेजीत झाले आहेत. बजाज ऑटोच्या समभागातही १ टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनी डिसेंबर तिमाही निकाल आज जाहीर करणार आहे.
गुरूवारी शेअर मार्केटमध्ये निफ्टीच्या सर्व प्रमुख १२ इन्डेक्सवर तेजी होती. ऑटो इन्डेक्समध्ये १ टक्क्याहून जास्त तेजी आहे. तर आयटी आणि रियल्टी इन्डेक्समध्ये अर्ध्या टक्क्याहून जास्त तेजी आल्याचे दिसून येत आहे. बँक आणि फायनान्शिअल इन्डेक्स मजबूत झाले असून एफएमजीसी आणि फार्मा क्षेत्रातही तेजी आहे.