राजूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे. तसेच, संजय गांधी निराधार योजनेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.
मंत्री रामदास आठवले अकोले येथे आले असता कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने त्यांची भेट घेतली. संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार, श्रावणबाळ व दिव्यांग पेन्शन यासारख्या निराधार योजनेचे एक हजार रुपये मानधन अल्प असल्याने ते वाढवण्यात यावे. राज्यातील वृद्ध व विधवा महिलांसाठी ही एकमेव योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेतील आपला हिस्सा वाढवावा, अशी मागणी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने अकोले येथे मंत्री आठवले यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेतील जाचक अटी दूर करायला हव्यात. १८ वर्षाचे मूल असेल तरी त्या वेळेला पेन्शन मिळत नाही. उत्पन्नाची अट ५० हजार रुपये करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी हेरंब कुलकर्णी, शिवाजी नेहे, संगीता साळवे, रोहिणी कोळपकर, भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.