मुंबईत अमली पदार्थ नियंत्रण कक्षांने (NCB)शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा टाकत मोठी कारवाई केली. या घटनेला २४ तास उलटत नाही तोवर दुसरीकडे भारतीय सीमेवर सुरक्षा दलाने ड्रग्जविरोधात धडक कारवाई केली आहे. सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने उरी सेक्टरमध्ये ही कारवाई करत तब्बल २५ ते ३० किलोग्रॅम हिरोईन आणि इतर ड्रग्जचा साठा हस्तगत केला आहे. या ड्रग्जची किंमत जवळपास ३० कोटींच्यावर असल्याची माहिती समोर येत आहे.
Jammu & Kashmir | Troops of Indian Army recovered two bags near LoC in Uri Sector, which contained 25-30 kgs of heroin-like substance in packages with Pakistani markings. An FIR has been registered: Baramulla Police pic.twitter.com/ESITmr36Hn
— ANI (@ANI) October 3, 2021
भारतीय सैन्यातील संयुक्त सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहिम राबवत हे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे. सीमारेषेवरील उत्तर काश्मीर भागातील उरी शहरातून शनिवारी रात्री उशीरा हा ड्रग्ज साठा हस्तगत करण्यात आला आहे. बारामुल्लाच्या एसएसपी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाला सीमरेषेवर काही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. या हालचालींवर लक्ष केंद्रीत करत सुरक्षा दलाने ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत ३० किलो वजनाचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे ड्रग्ज पेडलर भारतीय सैन्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. मात्र भारतीय सैन्याच्या जवानांना पाहताच या पेडलरने घटनास्थळावरून पोबारा केला. मात्र सैन्याने मोठा ड्रग्जसाठा जप्त केला आहे. हा जप्त केलेला ड्रग्जसाठा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. यासंदर्भात आता पोलिसांकडून सखोल तपासणी सुरु आहे.
मुंबईत एनसीबीची धडक कारवाई
मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धडक कारवाई केली होती. यावेळी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह दहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. काही वेळापूर्वीची एनसीबीकडून आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये काही बड्या उद्योगपतींच्या मुला-मुलींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता आर्यन खानसह तीन जणांनी एनसीबीने अटक करत वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात दाखल केले आहे. यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर केले जाईल.