बिहारच्या अररिया जिल्ह्यातून एका पत्रकाराच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. राणीगंजमध्ये एका वृत्तपत्राच्या पत्रकाराची निर्भीड हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पत्रकाराच्या घरात घुसून गोळ्या झाडल्या. गोळी लागल्यानं पत्रकार विमल कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. भावाच्या खून खटल्यातील तो एकमेव साक्षीदार होता. या घटनेनंतर परिसरात घबराटीचं वातावरण आहे. पत्रकाराच्या हत्येनंतर कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. (Bihar News Araria murder Journalist killed in Bihar Bullets fired into the house)
पहाटं असल्यानं लोकांची वर्दळ कमी होती
विमल कुमार यादव यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. पत्नी पूजा देवी यांनी सांगितले की, सकाळी घराचा दरवाजा ठोठावून पतीच्या नावाने आवाज देण्यात आला. दोघांनी उठून घराचा दरवाजा व ग्रील उघडलं. त्यानंतर विमल कुमार हे मुख्य गेट उघडून दरवाजाजवळ पोहोचताच गोळी झाडल्याचा आवाज आला. विमल कुमार यांचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने त्या दिशेने धाव घेतली तर विमल कुमार हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना गोळीबाराची माहिती दिली. परंतु, पहाटं असल्यानं फारसे लोक घराबाहेर नव्हते.
दोन वर्षांपूर्वी भावाचा खून झाला होता
पूजा देवी यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी त्यांचा दीर गब्बू यादव याचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. त्यांचे पती विमल कुमार यादव हे मुख्य साक्षीदार होते. न्यायालयात खटला सुरू होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी न्यायालयात साक्ष दिली होती.
विमल कुमार यांच्या हत्येनंतर जिल्हातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने तिथे पोहोचले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अमरेंद्र कुमार, सचिव अमितकुमार अमन, राकेश कुमार, मिंटू सिंग यांच्यासह अनेक पत्रकारांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मारेकऱ्यांना लवकर अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी पत्रकारांच्या असुरक्षिततेबाबत पत्रकार संघाने आंदोलनाबाबत चर्चा केली.
( हेही वाचा: संशय बळावला अन् त्याने लिव्ह-इन रिलेशनशिपमधील प्रेयसीलाच संपवले )
जळगावात पत्रकाराला मारहाण
जळगावच्या पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना तिघांनी लाथांनी मारलं आणि ही भीती, त्यांनी 4 दिवसांआधीच व्यक्त केली होती. मारहाणीनंतर, संदीप महाजनांनी पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांवर आरोप केला आहे. संदीप महाजनांना रस्त्यात खाली पाडून, कोणी डोक्यावर लाथा मारल्या, कोणी तोंडावर लाथा मारल्या, असं अतिशय भयानक दृश्य होतं. याच्या निषेधार्थ मुंबईतील पत्रकारांनी, 17 ऑगस्टला हुतात्मा चौकात आंदोलन करताना पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली होती.