जादूटोण्याच्या संशयातून एका कुटुंबातील ७ व्यक्तींना अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना चंद्रपूरात घडली आहे. चंद्रपुरातील जिवती तालुक्यातील या ७ जणांवर जादूटोणा करत असल्याचा संशय घेत त्यांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आहे, मारहाण झालेल्या व्यक्तींमध्ये चार महिला आणि तीन वृध्दांचा समावेश आहे. या जब्बर मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पाच व्यक्तींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द गावात ही घटना घडली. गावात भानामती हा अघोरी प्रकार करत असल्याचा संशयावरून या चार महिला आणि तीन वृध्दांना खांबाला बांधून जीवघेणी मारहाण करण्यात आली. गावातील नागरिकचं या मारहाणीत सहभागी झाल्य़ाचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
साहेबराव उके (४८), शिवराज कांबळे (७४) ,एकनाथ उके (७०), शांताबाई कांबळे (५३), धम्माशीला उके (३८) पंचफुला उके (५५), प्रयागबाई उके (६४) अशी मारहाण झालेल्या पीडित कुटुबांतील सदस्यांची नावे आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करताना या व्यक्तींच्या मदतीसाठी किंवा वाचवण्यासाठी एकही व्यक्ती पुढे आला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितांची सोडवणूक केली. तसेच १२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.