घरक्राइमइन्स्टाग्रामवरची मैत्री महिलेच्या अंगलट

इन्स्टाग्रामवरची मैत्री महिलेच्या अंगलट

Subscribe

---अपहरण करून राजस्थानमध्ये विक्री करून जबरदस्तीने लावले लग्न

वसईतील राजोडी गावातील विवाहितेला इन्स्टाग्रामवरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. इन्स्टाग्रामवरील मित्राने पोलीस दलात भरती करण्याच्या बहाण्याने तिला बोलावून घेऊन थेट राजस्थानमधील एका इसमाला विकून त्याच्याशी लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. अर्नाळा पोलिसांनी थेट राजस्थान गाठून पीडित महिलेची सुटका करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलेल्या इसमाला ताब्यात घेतले आहे.

विरारजवळील खर्डी गावात राहणारी महिला नवर्‍याशी भांडण झाल्याने महिनाभरापूर्वी राजोडी येथील आईकडे आली होती. नोकरी करीत असलेल्या त्या महिलेची इन्स्टाग्रामवर दिनेश पुरी नावाच्या इसमाशी मैत्री झाली. त्याने तिला लग्नाचेही आमिष दाखवले होते. स्वतः आर्मीत असल्याची बतावणी करणार्‍या दिनेश पुरीने तिला पोलीस दलात भरती करण्यासाठी ट्रेनिंग देण्याच्या बहाण्याने १२ जानेवारीला अहमदाबादला बोलावून घेतले. अहमदाबादला दिनेश पुरी आलाच नाही. त्याऐवजी स्टेशनवर तिला घ्यायला चेतन भारती, मसर पुरी, भावेश पुरी आले होते. तिला राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील शिवानी बालोत्रा या चेतन भारतीच्या घरी नेण्यात आले. त्यानंतर १६ जानेवारीला जवळच्याच भिमनाल गावातील कोर्टात नेऊन तिचे चेतन भारतीशी जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.

- Advertisement -

लग्नानंतर चेतनने तिला एक लाख रुपयांमध्ये विकत घेतल्याची धक्कादायक माहिती दिली. लग्नानंतर चेतनने तिला स्वतःच्या घरात डांबून तिच्याशी तो जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता. अखेर पीडितेने संधी साधून शेजारच्या एका इमसाच्या मोबाईलवरून कोल्हापूर येथे राहणार्‍या आपल्या बहिणीशी संपर्क साधून घडलेली हकिकत सांगितली.

तिच्या बहिणीने आईला ही माहिती दिली. आईने ती बेपत्ता झाल्याची तक्रार आधीच अर्नाळा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. आईने अर्नाळा पोलिसांच्या कानावर ही हकिकत सांगितल्यानंतर अर्नाळा पोलिसांचे एक पथक राजस्थानमधील शिवानी बालोत्रा गावी रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी पीडितेची सुटका करून आरोपी चेतन भारतीला ताब्यात घेऊन अर्नाळा पोलीस ठाण्यात आणले. तसेच पीडितेला तिच्या आईच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

पोलीस चौकशीत चेतन भारतीने पीडितेला गावातीलच दिनेश पुरी, मसल पुरी, भावेश पुरी यांच्याकडून लग्नासाठी विकत घेतल्याची माहिती दिली. आता या टोळीचा माग पोलीस काढत आहेत. या टोळीने अशाच पद्धतीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचा संशय असून त्यांच्या अटकेनंतर अधिक माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -